Alibaug Virar Corridor: मागील नऊ वर्षांपासून रखडलेला विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर प्रकल्प आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) 126 किमी लांबीच्या या रस्त्याच्या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम 'बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' (BOT - Build Operate and Transfer) मॉडेल अंतर्गत करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा प्रकल्प गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. यामुळे अलिबाग आणि विरार या परिसराचा आणखी वेगाने विकास होण्यास मदत होणार आहे.
अलिबाग विरार हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर विरार ते अलिबाग दरम्यानचा प्रवासाचा वेळ 4 तासांवरून अंदाजे 90 मिनिटांपर्यंत कमी होईल. MSRDC ने प्रकल्पाचा अहवाल BOT अंतर्गत सरकारला सादर केला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. BOT मॉडेलनुसार, खासगी कंपनी स्वतः प्रकल्पासाठी निधी उभा करेल, प्रकल्प पूर्ण झाल्यावर टोल वसूल करेल आणि नंतर रस्ता सरकारकडे सुपूर्द करेल. हा रस्ता झाल्यास अलिबाग ते विरार हे अंतर फक्त 90 मिनिटात कापता येणार आहे.
या प्रकल्पाचा DPR (Detailed Project Report) सर्वप्रथम 2016 मध्ये तयार झाला होता. यापूर्वी अनेकवेळा निविदा मागवूनही कंपन्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. किंवा मागवलेल्या निविदेपेक्षा 36% जास्त बोली लावली होती. यामुळे MSRDC ने आता BOT तत्त्वावर प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, भूसंपादन प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारने 2000 कोटी रुपयांची बँक हमी देण्याचे निश्चित केले आहे.
MMR च्या कनेक्टिव्हिटीत क्रांती हा 126 किमीचा कॉरिडॉर दोन टप्प्यात पूर्ण केला जाईल. पहिला टप्पा पालघरमधील नवघर ते पेणमधील बालावली दरम्यान 96.410 किमीचा असेल. हा रस्ता JNPT, नवी मुंबई विमानतळ, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, मुंबई-गोवा महामार्ग, आणि अटल सेतू यांसारख्या प्रमुख ठिकाणांना आणि मार्गांना जोडणार आहे. यामुळे MMR (Mumbai Metropolitan Region) मधील कोणत्याही भागात तासांऐवजी काही मिनिटांत पोहोचणे शक्य होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world