- भारताने टी 20 विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकला आहे
- कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयानंतर मैदानातील माती कपाळाला लावून खेळपट्टीप्रती आदर व्यक्त केला होता
- सूर्यकुमारने सांगितले की मातीमुळेच तो आज येथे आहे त्यामुळे तिला वंदन करणे त्याचे कर्तव्य होते
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 96 धावांनी दणदणीत विजय मिळवून भारताने तिसऱ्यांदा टी 20 विश्वचषकावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानातील माती कपाळाला लावली होती. ही दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. मुंबईत परतल्यानंतर दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सूर्याने या कृतीमागची आपली भावना स्पष्ट केली. असं आपण का केलं? कशासाठी केलं? या मागची आपली भावना काय होती हे सुर्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सर्वांना पडलेलं कोडं त्यानेच सोडवलं आहे.
सूर्यकुमार म्हणाला की, "ज्या खेळपट्टीने आणि खेळाने मला आजवर सर्वकाही दिले, त्या प्रति आदर व्यक्त करणे माझे कर्तव्य होते. माझ्या मनात हीच भावना होती की, या मातीमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. म्हणूनच तिला वंदन करणे मला गरजेचे वाटले." अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक उंचावणे हा सुखावह अनुभव असल्याचेही त्याने नमूद केले. जे आपल्या मनात होतं. आपली जी भावना होती ती त्यावेळी कृतीत उतरली असं ही त्याने यावेळी सांगितलं.
या स्पर्धेत सूर्याने 9 सामन्यांत 242 धावा केल्या. जरी त्याची वैयक्तिक फलंदाजी सरासरी 30.25 राहिली असली, तरी त्याच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहचा त्याने ज्या पद्धतीने वापर केला, तो या स्पर्धेतील 'टर्निंग पॉईंट' ठरला. पॉवरप्लेमध्ये बुमराहला गोलंदाजी देणे आणि शेवटच्या 5 ओव्हरमध्ये त्याचा अचूक वापर करणे, या सूर्याच्या निर्णयांनी भारताचा विजय सुकर केला. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयात सूर्याचा मोठा वाटा होता.
सूर्यकुमारने फलंदाजीपेक्षा आपल्या कप्तानीने सर्वांची मने जिंकली. त्याने केलेल्या प्रभावी बदलांमुळे प्रतिस्पर्धी संघांना धावा करणे कठीण झाले. विशेषतः निर्णायक क्षणी बुमराहला गोलंदाजीला आणण्याचा त्याचा निर्णय मास्टरमाईंड ठरला. सूर्या म्हणाला, "विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावणे हा विलक्षण क्षण होता. मैदानाच्या मातीला कपाळाला लावणे हा केवळ एक आदर होता. आज मी जो काही आहे, तो या खेळामुळेच आहे." सलग दुसऱ्यांदा विश्वविजेत्या संघाचा भाग असणे हे भाग्याचे असल्याचे त्याने सांगितले. या आधी रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला होता. त्या संघात ही सूर्या होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world