राहुल कांबळे, प्रतिनिधी
Navi Mumbai : नवी मुंबईत सायबर गुन्हेगारांचा कहर पुन्हा एकदा समोर आला आहे. खारघर येथील ८० वर्षीय निवृत्त वृद्धाची तब्बल ४ कोटी ३८ लाख ६२ हजार २१० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. अटकेची भीती, बनावट शासकीय कागदपत्रे आणि मोठ्या अधिकाऱ्यांची नावे वापरून आरोपींनी वृद्ध नागरिकाला मानसिक दबावाखाली आणत कोट्यवधी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
नवी मुंबईत नेमकं काय घडलं?
या प्रकरणातील फिर्यादी सुरेंद्रकुमार शर्मा (वय ८० वर्षे) हे खारघर, नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. ते निवृत्त असून शांत आयुष्य जगत होते. मात्र, २१ नोव्हेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत अनोळखी सायबर गुन्हेगारांनी त्यांना जाळ्यात ओढले. आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याशी ऑनलाइन संपर्क साधत विश्वास संपादन केला आणि नंतर भीती दाखवून मोठी आर्थिक फसवणूक केली. या संपूर्ण प्रकरणात फिर्यादीकडून ४,३८,६२,२१० (चार कोटी अडतीस लाख बासष्ट हजार दोनशे दहा रुपये) इतकी प्रचंड रक्कम विविध बँक खात्यांत वर्ग करून घेतल्याचे समोर आले आहे. ही रक्कम त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीची असल्याने वृद्ध नागरिकाला मानसिक धक्का बसला आहे.
फसवणुकीची पद्धत...
सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अनोळखी आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला फोन कॉल्स, व्हॉट्सॲप आणि इतर ऑनलाइन माध्यमांतून संपर्क साधला. त्यांनी स्वतःला शासकीय यंत्रणेशी संबंधित असल्याचे भासवले. विशेष म्हणजे आरोपींनी संदीप राव, प्रदीप जैसवाल आणि विश्वास नांगरे पाटील यांसारख्या ओळखीच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करून फिर्यादीवर विश्वास बसवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी बनावट शासकीय नोटीसा, पत्रे आणि कागदपत्रे पाठवून फिर्यादीला एखाद्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्यात आले असल्याचा आभास निर्माण केला. “तुमच्यावर गुन्हा दाखल असून तातडीने अटक होऊ शकते,” अशी धमकी देत त्यांनी वृद्धाला घाबरवले. या मानसिक दबावामुळे आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वर्ग केले.
गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी बी.एन.एस (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, आरोपींनी वापरलेले मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, व्यवहारांची साखळी (money trail) आणि डिजिटल पुरावे तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यांतील बँक खात्यांचा वापर झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वृद्ध नागरिक सायबर गुन्हेगारांचे मुख्य लक्ष्य
अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. निवृत्तीनंतर जमा झालेली मोठी रक्कम, तांत्रिक ज्ञानाचा अभाव आणि शासकीय कारवाईची भीती या गोष्टींचा गैरफायदा घेतला जातो. या प्रकरणातही आरोपींनी अगदी याच पद्धतीचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणताही शासकीय अधिकारी फोन किंवा ऑनलाइन माध्यमातून पैसे मागत नाही, तसेच अटकेची पूर्वसूचना देत नाही, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना (Awareness)
- सायबर पोलिसांच्या व तज्ज्ञांच्या सूचनांनुसार नागरिकांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- शासकीय अधिकारी असल्याचे सांगून पैसे मागितल्यास सावध रहा.
- फोन, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर आलेल्या धमकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.
- कोणतीही बनावट नोटीस, अटक वॉरंट किंवा कागदपत्रे आली असल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा.
- ओटीपी, बँक तपशील, पॅन कार्ड, आधार क्रमांक कोणालाही देऊ नका.
- संशयास्पद कॉल आल्यास संभाषण त्वरित बंद करा.
- फसवणुकीची शंका असल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
- ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत कुटुंबीयांनीही विशेष लक्ष ठेवावे आणि त्यांना अशा फसवणुकीबाबत नियमित माहिती द्यावी.
खारघरमधील या घटनेने सायबर गुन्हेगार किती योजनाबद्ध आणि निर्दयी पद्धतीने वृद्ध नागरिकांना लक्ष्य करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोट्यवधींची फसवणूक ही केवळ आर्थिक नुकसान नसून ती मानसिक आणि सामाजिक धक्का देणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठांनी, अधिक जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. सायबर पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच आरोपींचा पर्दाफाश होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तोपर्यंत “सावध रहा, सतर्क रहा” हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा एकमेव मंत्र आहे.