- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तपासात मोठी अपडेट समोर आली आहे
- पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी १८० मुलींचे शोषण झाल्याच्या सोशल मीडियावरील अफवा फेटाळून लावल्या आहेत
- प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी आयन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट झाले आहे
शुभम बायस्कार
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील महिला आणि मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओंनी संपूर्ण राज्यात खळबळ माजवली होती. सोशल मीडियावर 180 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणातील तपासाचा प्राथमिक तपशील जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी NDTV मराठीला महत्वाची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी या प्रकरणातील एक-एक गोष्टीचा खुलासा केला आहे. शिवाय शोषण झालेल्या मुली 180 होत्या का याची ही माहिती त्यांनी उघड केली आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात 8 पीडित मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो समोर आले आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, इतर कोणी पीडित आहेत का, याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणात 180 मुलींचे शोषण झाले आहे हे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे. दरम्यान, या कृत्याचा जागतिक पॉर्नोग्राफी जगताशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुख्य आरोपी आयन याने मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. त्याचे व्हिडीओ ही समोर आले आहेत. तर एका आरोपीने त्याला फ्लॅट उपलब्ध करून दिला होता. इतर आरोपींनी हे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्यात मदत केली. ज्या वेबसाईटवर हे व्हिडिओ प्रसारित झाले, त्या ओळखून ते हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे असं ही यावेळी पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी स्पष्ट केले आहे.
नक्की वाचा - Amravati News : एक तरुण, 180 मुली, 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; अमरावतीत खळबळ
या प्रकरणाला सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. विशाल आनंद यांनी 'कोचिंग जिहाद'चा मुद्दा स्पष्टपणे फेटाळला आहे. पीडित मुलींची आणि आरोपींची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती, असे त्यांनी सांगितले. परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणाने अमरावती जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 180 मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणातील वस्तुस्थिती मांडली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world