- बदलापूर शहरातील एका निवासी सोसायटी परिसरात काही संशयित हातात धारदार कोयते घेऊन फिरताना आढळले
- या संशयितांनी चोरी किंवा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने रात्री सोसायटीत प्रवेश केला असण्याचा संशय व्यक्त
- स्थानिकांनी कोयता गँगविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे
- अमजद खान, प्रतिनिधी
Badlapur News: बदलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूरमध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका गजबजलेल्या निवासी सोसायटीच्या परिसरात काही संशयित तरुण हातात कोयते घेऊन फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार चोरी किंवा एखादा मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने सुरू होता, असा संशय व्यक्त केला जात आहे.
निवासी सोसायटीत संशयितांचा वावर
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर शहरातील एका उच्चभ्रू आणि मुख्य वस्तीत असलेल्या निवासी सोसायटीच्या आवारात काही अज्ञात तरुण हातात धारदार कोयते घेऊन फिरताना आढळले. या संशयितांच्या हालचाली अत्यंत संशयास्पद होत्या. रात्रीचा फायदा घेऊन हे तरुण सोसायटीत शिरले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने परिसरातील नागरिकांच्या किंवा सुरक्षारक्षकांच्या हे वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. पण या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहरात चिंतेचे ढग जमा झाले आहेत.
(नक्की वाचा : Navi Mumbai: थरकाप उडवणारी घटना! परदेशी जॉबच्या नादात तरुण कंगाल, नवी मुंबईतील एजंटने लाखो रुपयांना गंडवलं)
बदलापूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बदलापूर शहरात कोयता गँगने दहशत माजवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शहराच्या विविध भागात टोळक्यांनी हातात कोयते घेऊन धुडगूस घातल्याच्या, गाड्यांची तोडफोड केल्याच्या आणि व्यापाऱ्यांना धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा भरवस्तीत कोयते घेऊन फिरणाऱ्या गुंडांमुळे 'बदलापूरकर सुरक्षित आहेत का?' असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये यामुळे असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
(नक्की वाचा : Ambernath Crime: महिलेची सटकली अन् वाहने पेटवली, 5 गाड्यांची राखरांगोळी, अंबरनाथमधील घटना)
कठोर कारवाईची मागणी
या घटनेनंतर बदलापूरमधील स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत संताप व्यक्त केला आहे. दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी पोलिसांकडे केली जात आहे.