
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिने उलटले आहेत. पण त्याचे पडसाद अजूनही बीड जिल्ह्यात जाणवत आहेत. संतोष देशमुख यांचं नाव घेऊन आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे बीड परत एकदा चर्चेत आले आहे. बीडमध्ये एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. ते ही भर रस्त्यात. या तरूणाला मारताना मारेकऱ्याने संतोष देशमुखांच्या नावाचा उल्लेख केला. ही घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडच्या तांदळवाडी भिल्ल येथे शेताच्या बांधा वरूनचा वाद होता. या वादावरून एक तरुणावर भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्यावेळी वार करणारा ‘तुझा आता संतोष देशमुख करतो' अशी धमकी देत होता. कैलास सांगुळे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. याच्यावरच कोयत्याने वार करण्यात आले. कैलासला चार तरुणांनी मारहाण केली. शिवाय कोयत्याने वारही केले. त्यात तुझा संतोष देशमुखचं करतो असं ही ते त्याला म्हणत होते.
कैलास सांगुळे या तरुणावर हा जीवघेणा हल्ला झाला. यात कैलासच्या शरीरावर 10 हून अधिक वार करण्यात आले. त्यात तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेला 24 तास उलटून गेले तरीही बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना कसलीच भीती नसल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेनंतर कैलासच्या कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या भावाचं काही बरंवाईट झालं तर यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल', असा आक्रोश पीडिताच्या भावाने व्यक्त केला आहे. काही महिन्या पूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अतिशय क्रुरपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. आता कुणालाही मारताना त्यांच्याच नावाचा उल्लेख केला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world