आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : सध्या महाराष्ट्रभरात आयएएस अधिकारी आणि नुकतेच अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू झालेले तुकाराम मुंढे चर्चेत आहेत ते त्यांच्या कारवाईमुळे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी कारवाई सपाटा लावला आहे. अगदी पनीर, आईस्क्रिम ते पाणीपुरी असो... भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री करणारे आणि विनापरवाना सुरू असलेल्या दुकानदारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. याची प्रचिती बीडमध्ये पाहायला मिळाली. तुकाराम मुंढे हे बीडचा दौरा करणार असल्याची चर्चा असतानाच दुकानदारांची तंतरली आणि त्यांनी थेट दुकानांचे शटर डाऊन केल्याचं पाहायला मिळालं.
तुकाराम मुंढेंच्या आगमनी चर्चा अन् शटर डाऊन...
बीडमधील परळी शहरात आज सकाळपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या आगमनाची चर्चा रंगली होती. या चर्चेमुळे शहरातील अनेक विनापरवाना सुरू असलेल्या पानटपऱ्या आणि लहान व्यावसायिक आस्थापना बंद असल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या कारवायांमुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रशासनिक धडाक्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर परळी शहरातही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने अनेक अवैध व्यावसायिकांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
नक्की वाचा - Mumbai News : महिलांच्या अत्यंत प्रिय पदार्थावर FDA ची नजर; आयुक्त तुकाराम मुंढेंचा काय आहे प्लान?
कोणतेही दुकान, हॉटेल, पानटपरी किंवा किराणा दुकान आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू ठेवू नये, तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त वस्तूंची विक्री करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता. या घडामोडींमुळे परळी शहरातील अनेक विनापरवाना पानटपऱ्या दिवसभर बंद राहिल्याचं दिसून आलं. प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या भीतीमुळे शहरात काही प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world