
सुमित पवार, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhajinagar Tragedy: वैजापूरहून छत्रपती संभाजीनगरमध्ये गेलेले आई-वडिल घरी परतल्यावर त्यांनी मुलीला पाणी मागितले, पण घरातून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील रमाईनगर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण?
पायल सुधाकर गोतीस (वय 20, रा. रमाईनगर, खंडाळा, ता. वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. पायल वैजापूर येथील कदम स्कूल ऑफ जेएनएम नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात नर्सिंगचे शिक्षण घेत होती. 8 सप्टेंबर रोजी तिचे आई-वडील कामासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले होते, तेव्हा पायल घरी एकटीच होती. याच दरम्यान, दुपारी तिने आई-वडिलांना फोन करून ते कधी परत येणार आहेत असे विचारले होते.
( नक्की वाचा : '' जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल...", ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; अकोल्यात खळबळ )
आई-वडील घरी परतल्यानंतर त्यांनी मुलीला पाणी मागितले. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले. त्यावेळी पायलने ओढणीच्या साहाय्याने छताला गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने तिला खाली उतरवून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पायलच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झाल्यानंतर खंडाळा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कायम आनंदी असणाऱ्या पायलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world