मंगेश जोशी, प्रतिनिधी
Jalgaon Crime News : जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौथी मुलगी झाल्याच्या रागातून नराधम बापाने 3 दिवसांच्या मुलीच्या डोक्यावर लाकडी पाटाने हल्ला करून तिचा खून केला. दीड महिन्यानंतर पोलीस तपासात ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी निर्दयी बापाला पहूर पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा लालचंद राठोड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोराड या गावात चौथी मुलगी झाल्याच्या रागातून नराधम बापाने 3 दिवसाच्या पोटच्या मुलीची हत्या केली. ही भयंकर घटना 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पहूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.परंतु, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि या हत्येचा उलगडा केला.
नक्की वाचा >> Viral Video : एक दोन नव्हे 6 सिहांनी शेतात लावली होती फिल्डिंग..शेतकऱ्याने कॅमेरा झूम करताच घडलं असं काही..
मुलगा वंशाचा दिवा अन् मुलगी झाली तर..
एकीकडे ‘बेटी बचाव, बेटी पढाव'सारख्या योजना राबवल्या जात असताना, दुसरीकडे अशी अमानवी कृत्ये समाजाच्या तोंडावर चपराक ठरत आहेत. मुलगी म्हणजे भार, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही विकृत मानसिकता अजूनही काही घरांमध्ये खोलवर रुजलेली आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते.
कायद्याचा धाक की सामाजिक परिवर्तन?
कायद्याने अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा आहे, मात्र मानसिकतेत बदल घडवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. मुलगा आणि मुलगी यात भेद न करता समानतेची शिकवण घराघरात रुजवली गेली, तरच अशा घटना थांबू शकतात. कारण ही केवळ एका चिमुकलीची हत्या नाही, तर माणुसकीवरचा काळा डाग आहे. वैज्ञानिक युगातही जर आपण माणूस म्हणून अपयशी ठरत असू, तर विकासाचा अर्थ काय, असा गंभीर प्रश्न या घटनेने समाजासमोर उभा केला आहे.