योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime : शहरातील मलकापूर परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित महिलेने सासरच्या कुटुंबीयांकडून लैंगिक व मानसिक छळ झाल्याचा गंभीर आरोप करत खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरोधात विनयभंग,मानसिक छळ आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचे लग्न 25 मे 2025 रोजी झाले होते.4 जून रोजी ती पतीच्या संयुक्त कुटुंबात नांदण्यासाठी आली होती.सुरुवातीला सर्व काही चांगलं असल्यासारखं तिला वाटलं. पण काही दिवसांतच सासरच्या घरातील वातावरण बदललं आणि तिचा छळ सुरु झाला, असा आरोप पीडित महिलेनं केला आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने पीडित महिलेनं सुरुवातीला कोणाकडेही तक्रार केली नाही,असंही तिने म्हटलं आहे. सासरे सुभाष तायडे,दीर शुभम तायडे, सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे आणि पती ऋषभ तायडे अशी आरोपींची नावं आहेत.
सासऱ्याकडून सतत विनयभंग, दीराने केले अश्लील चाळे
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार,सासरे सुभाष तायडे हे घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पीडितेच्या जवळ येत तिच्या अंगाला स्पर्श केला,असा आरोप आहे. पाठीवर,खांद्यावर आणि कंबरेवर हात फिरवत “तुला जे हवे ते देईन,तुझ्या नवऱ्यात काही दम नाही,” असं आरोपी सासरा सुनेला म्हणाला,असंही तक्रारीत सांगण्यात आलं आहे या प्रकारामुळे ती घाबरून जात असे आणि स्वतःला खोलीत बंद करून घेत असे,असंही पीडितेचं म्हणणं आहे.दीर शुभम तायडे विनाकारण पीडित महिलेच्या खोलीत यायचा.सौंदर्यावर,कपड्यांबाबत आणि लज्जास्पद नजरेने तो पाहायचा,असंही पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. या सततच्या त्रासाने मानसिकदृष्ट्या खचून गेल्याचं पीडित महिलेचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> BMC Election 2026: मुंबईत हिंदू-मुस्लिमांची लोकसंख्या किती? 30 टक्के मराठी मतदान कोणाच्या पारड्यात? जाणून घ्या
“बाबांच्या मनासारखे राहा, तसं केल्यास घरात सुखाने राहशील"
या गंभीर प्रकारांबाबत आरोपी वर्षा तायडे आणि शिल्पा तायडे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तक्रार न करता तडजोड करण्याचा सल्ला देत आरोपींच्या वर्तनाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्याचा आरोपही पीडितेने केला आहे “बाबांच्या मनासारखे राहा,तसे केल्यास घरात सुखाने राहशील,”असे सांगून मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.पती ऋषभ तायडे कोणताही विरोध न करता “वडील सांगतील तसे वागावे लागेल,”असं पत्नीला सांगितल्याचा आरोप आहे.30 ऑक्टोबर 2025 रोजी पतीने पत्नीला (पीडित महिला) माहेरी पाठवले. मानसिक धक्का,भीती आणि समाजात बदनामी होईल या कारणांमुळे उशिरा तक्रार केल्याचे सांगत पीडितेने न्यायाची मागणी केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस करत आहेत.
नक्की वाचा >> Pune News: राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरात घुसून भाजप कार्यकर्त्यांचा राडा, महिला डॉक्टरचा केला विनयभंग!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world