Kalyan News: धावत्या ट्रेनमध्ये फटका मारला, तरुण थेट रूळावर कोसळला, पाय गमावला अन्...

पण या दुर्घटनेत दुःखाची परिसीमा तेव्हा झाली, जेव्हा जखमी गौरव जमीनीवर वेदनेने विव्हळत असताना एक चोर त्याच्या जवळ आला. त्याचा मोबाइल व रोकड घेऊन पसार झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

एक क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून जातं. नाशिकचा 26 वर्षीय गौरव निकम याला रविवारी सकाळी याच गोष्टीचा कटू अनुभव आला. शेतकरी असलेल्या गौरवने ठाणे येथे एक महत्त्वाचं काम आटपून घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला काय माहित होतं, की ही परतीची सफर त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. गौरव तपोवन एक्स्प्रेसने ठाण्याहून नाशिककडे जात होता. त्यावेळी तो  ट्रेनच्या दारात उभा राहून कोणाशी तरी बोलत होता. ट्रेन आंबिवली स्थानकाजवळ आली आणि अचानक एका फटका मार चोराने बाहेरून हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे गौरवचा तोल गेला आणि तो सरळ चालत्या ट्रेनमधून खाली पडला. त्याचा एक पाय ट्रेनखाली आल्यामुळे कापला गेला.

नक्की वाचा - Jalne News: भाजप आमदाराचा कार्यकर्ता निघाला चोर, त्याने कसली चोरी केली माहित आहे का?

पण या दुर्घटनेत दुःखाची परिसीमा तेव्हा झाली, जेव्हा जखमी गौरव जमीनीवर वेदनेने विव्हळत असताना एक चोर त्याच्या जवळ आला. त्याचा मोबाइल व रोकड घेऊन पसार झाला. जखम, वेदना, अपंगत्व आणि लूट हे सगळं काही क्षणात गौरवच्या नशिबात लिहिलं गेलं. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन इराणी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. इराणी टोळ्यांच्या गुन्हेगारी इतिहासाची माहिती सर्वांनाच आहे. कायद्याच्या दृष्टीने तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला मिळणारी शिक्षा ही मर्यादित असणार. मात्र गौरवला मिळालेली "शिक्षा", दोन्ही पाय गमावलेली आणि आयुष्यभर चालणाऱ्या वेदना  याचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

नक्की वाचा - Ramdas Kadam: 'गृहराज्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले', कदमांचा मोठा आरोप

फक्त "अल्पवयीन" असल्यामुळे गुन्हेगारांना माफ केलं जावं का? एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घटनेला एवढीच किंमत असावी का? ही घटना केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नाही, हा आपल्या समाजव्यवस्थेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवरही मोठा प्रश्नचिन्ह आहे. आंबिवली परिसरात अशा घटना याआधीही घडल्या आहेत. आता वेळ आली आहे की अशा घटनांना गांभीर्याने घेतलं जावं. कठोर कायदे आणि जलद न्यायाची नितांत गरज आहे. जेणेकरून पुढचा गौरव निकम ट्रेनने प्रवास करताना आपल्या शरीरासोबतच आयुष्यही गमावणार नाही.