अविनाश पवार, प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात ‘माणूस विरुद्ध बिबट्या' संघर्षाचा प्रश्न आता ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिलेला नाही. नुकतेच शहराच्या उपनगरात, आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीजवळ बिबट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. वारंवार सीसीटीव्ही फुटेजसमोर येत असल्याने पुण्यासारख्या महानगरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील वाढती बांधकामे, मोकळ्या जागांचे जलदगतीने नष्ट होणे आणि अन्नसाखळीत झालेला बदल—या सर्वांचा परिणाम म्हणून बिबट्यांचा वावर मानवी वास्तव्यात अनपेक्षितरीत्या वाढताना दिसतोय. रात्री उशिरा आणि पहाटे बिबट्यांच्या सावल्या दिसल्याच्या तक्रारी उपनगरी भागातून मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचा थेट परिणाम म्हणून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पालकांनी लहान मुलांना बाहेर सोडण्याबाबत भीती व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्यात नुकतीच वन विभाग आणि जागतिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या विशेषज्ञांनी मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी जगभरात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि रणनीतींचा सविस्तर परिचय करून दिला.
नक्की वाचा - Pune News : पुण्याहून विमानाने नागपुरला जाणं इतकं तापदायक? प्रवासी वैतागले, पुणे विमानतळावरील संतापजनक दृश्य
या कार्यशाळेत कशावर झाली चर्चा..
बिबट्यांना सुरक्षितरीत्या जेरबंद करण्याच्या पद्धती
शहरी भागासाठी विशेष ‘रॅपिड रेस्पॉन्स युनिट'ची गरज
नाईट व्हिजन ड्रोन आणि मोशन सेन्सर अलर्ट सिस्टीम
तसेच नागरिकांमधील अफवा, घबराट आणि चुकीच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृतीचे महत्त्व यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले.
वन विभागाच्या विशेष पथकांनीही या प्रशिक्षणात सहभाग घेऊन प्रत्यक्ष अनुभव मिळवला. तज्ज्ञांनी स्पष्ट केलं की, शहरांमध्ये बिबट्यांचा वावर वाढण्यामागे त्यांची शिकार कमी होणे आणि कचरा किंवा पाळीव प्राण्यांकडे सहज उपलब्ध होणारे अन्न ही प्रमुख कारणे आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन–वनविभाग–नागरिक या तिन्ही स्तरांवर एकत्रित कृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग साहस संस्था बिबट रेस्क्यू टीम
पुणेकरांना सध्या ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, त्या संदर्भात ही कार्यशाळा म्हणजे घटनेवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा पूर्वतयारी मजबूत करण्याचा मोठा टप्पा ठरणार आहे. ग्रामीण भागापासून उपनगरांपर्यंत वाढलेल्या बिबट्यांच्या हालचालींमुळे अस्वस्थता असली तरी, प्रशिक्षणानंतर प्रशासन अधिक सज्ज झाल्याचा विश्वास वन अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.