Mumbai News: मुंबई पोलिसांनी पंजाबमधील दोन व्यक्तींना अटक करून त्यांच्याकडून तुर्की बनावटीची दोन अत्याधुनिक पिस्तुल आणि 50 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या दोन्ही आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का? याचा तपास केला जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी (30 जून) याबाबतची माहिती दिली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने (AEC) पंजाबमधील रणजीत सिंह (वय 36 वर्षे) आणि अमृत पाल सिंह (वय 23 वर्षे) अशा दोन जणांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी बेकायदेशीर हत्यारे विकण्याचा प्रयत्न करत असताना ही कारवाई करण्यात आली
परदेशी हत्यारांसह अटक
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अरुण थोरात यांना मिळालेल्या विशेष माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाने वाडी बंदर परिसरात सापळा रचला होता. तिथे हे दोन्ही आरोपी शस्त्रास्त्रांचा सौदा करण्यासाठी पोहोचले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांनी पुढे सांगितले की, झडतीदरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून तुर्की बनावटीची प्रत्येकी एक जिगाना पिस्तूल आणि 25-25 जिवंत काडतुसे जप्त केली. जप्त करण्यात आलेली शस्त्रे तुर्की बनावटीची असल्याची पुष्टी पोलीस उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रोशन यांनी केली आहे.
(नक्की वाचा: शिक्षकाला धमकावलं, खिशातून चाकू काढला अन् थेट... छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्याचे धक्कादायक कृत्य)
लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध आहे का?
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की दोन्ही आरोपींवर पंजाबमध्ये हत्येचा प्रयत्न आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी ही परदेशी शस्त्रे मुंबईतील एका स्थानिक टोळीला देण्यासाठी आले होते. तसेच त्यांचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.
(नक्की वाचा : Mumbai News: फय्याज प्रेमजीने 30 हजार जणांना मारण्याचा कट का रचला होता? चौकशीत धक्कादायक कारण समोर)
(Content Source PTI)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world