Nagpur News: एका सुशिक्षित इंजिनिअर तरुण मुलीचा आणि तिच्या आईचा एकाच वेळी झालेला शेवट पाहून संपूर्ण नागपूर सुन्न झाले आहे. घराच्या बंद खोलीत मायलेकींनी गळफास घेतल्याची बातमी सकाळी वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वत्र खळबळ उडाली. वरवर पाहता ही आत्महत्या वाटत असली तरी, या घटनेमागे दडलेले सत्य काहीतरी वेगळेच असल्याचा संशय आता बळावू लागला आहे. कौटुंबिक छळ, संपत्तीचा हव्यास की आणखी काही? या प्रश्नांनी आता या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे.
काय आहे प्रकरण?
ही हृदयद्रावक घटना नागपूर मधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व्यंकटेश नगर भागात घडली आहे. 29 वर्षीय आकांक्षा लोकेश ब्रह्मे आणि तिची आई 52 वर्षीय संगीता श्रीराम डभाले या मायलेकींनी राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

शनिवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी या प्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
( नक्की वाचा : BJP Leader: शॉपिंगचं निमित्त अन् भाजपा नेत्याचा संशयास्पद अंत; 2 सख्या बहिणींशी लग्नानंतर घरात नेमकं काय घडलं?)
नातेवाईकांचा गंभीर आरोप
आकांक्षा ही उच्चशिक्षित असून तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले होते. मात्र, तिच्या मृत्यूंनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आकांक्षाचा पती तिच्यावर वारंवार संशय घेत असे आणि तिचा मानसिक छळ करत असे, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. इतकेच नाही तर, सासरच्या मंडळींकडून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता, असेही तिच्या मावसभावाने सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वीच आकांक्षाचे बाळ दगावले होते, त्या दुःखात असतानाच सासरच्यांकडून होणारा छळ असह्य झाल्याने हा प्रकार घडला असावा किंवा हा घातपात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
घटनेनंतर आकांक्षा आणि तिच्या नवऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोंच्या माध्यमातून त्यांच्या नात्यातील तणावाबाबत चर्चा रंगू लागली आहे. उच्चशिक्षित असूनही आकांक्षाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागला, याबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि मानसिक तणाव किती टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडू शकतो, याचे हे भयानक उदाहरण ठरले आहे.

या दुहेरी मृत्यूमागे नक्की काय कारण आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. आकांक्षाचा नवरा आणि सासरच्यांचा या घटनेत नक्की किती सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणात हत्येचे किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कलम लावायचे का, याचा निर्णय पोलीस घेतील. सध्या या घटनेमुळे नागपुरातील व्यंकटेश नगर परिसरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world