
नवी मुंबई: नात्यातील मैत्री, चेष्टा-मस्करीचं रूपांतर थेट खुनात होईल, याची कुणालाही कल्पना नसेल. मात्र तुर्भे परिसरात घडलेली एक घटना याचं भयावह उदाहरण ठरली आहे. 'मुलीवरून चिडवल्यामुळे' झालेल्या वादातून एका तरुणाने आपल्या मित्राचा गळा कापून खून केला असून या प्रकरणाने संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खून केलेल्या मित्राचे नाव संजय बेहरा (वय २२) असून तो महापे येथील आजवानी कॉरी परिसरात राहत होता. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी सुरेश होनहागा (वय २०) या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संजय आणि सुरेश हे दोघे मित्र होते. मात्र, काही दिवसांपासून संजय हा सतत सुरेशला "मुलीवरून चिडवत" होता. या चेष्टांमुळे सुरेशची बदनामी होत असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती. त्याने एक-दोन वेळा संजयला समजही दिली. मात्र, चेष्टा थांबण्याऐवजी अधिकच वाढत गेली.
अखेर या सगळ्याचा राग आणि अपमान मनात साठवत सुरेशने एक कट रचला. त्यानुसार, "खेकडे पकडायला जाऊ या," असा बहाणा करत त्याने संजयला तुर्भे परिसरातील एका घनदाट झाडीत नेले. तेथे त्यांनी एकत्र बसून मद्यपान केले. संजय नशेत बेजबाबदार झाला, हे पाहून संधी साधत सुरेशने धारदार कटरने संजयच्या गळ्यावर वार केले. या क्रूर हल्ल्यात संजयचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे, संपूर्ण प्रकार १३ वर्षांच्या एका मुलासमोर घडला. त्या मुलाने हा संपूर्ण थरार पाहिला आणि त्याचे मानसिक स्वास्थ्यही हादरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर सुरेश काही वेळ तसाच भटकत राहिला. मात्र हळूहळू त्याला आपल्या कृत्याचा खोलवर पश्चात्ताप झाला. बुधवारी त्याने तुर्भे पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन संपूर्ण प्रकाराची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करून अटक केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world