उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे तडीपार गुंडांनी चक्क पत्रकारावरच हल्ला केला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरात ही घटना घडली आहे. इथले तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती. याचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यात ते दोघे ही जबर जखमी झाले आहेत.
पत्रकार आणि भाऊ जखमी
शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. ह्या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ जखमी झाले आहेत. शिव कॉलनी येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर यांच्या विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्याचा राग करण आणि अर्जुनच्या मनात होता. या दोघांची या परिसरात मोठी दहशत आहे. आपल्या विरोधात बातमी दिली हे त्यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला.
हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या हल्ल्यात संदीपच्या भावाच्या हातावर तलवारीने वार करण्यात आला. त्यामुळे त्याला जबर जखम झाली आहे. तर संदीप सिंह याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. तो ही त्यात जबर जखमी झाला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आता या प्रकारणी हिललाईन पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करण आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहेत.
तडीपार गुंडांचा हैदोस
तडीपार गुंडाकडून पत्रकारावर हल्ला झाल्याने सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय. पत्रकारच सुरक्षित नसल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे कृत्य केले जात आहे. कल्याण डोंबिवली बरोबरच उल्हासनगरमध्ये ही अशा गुन्ह्यांच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. अशा घटना होतच राहील्या तर ही शहरं राहण्यासाठी खरोखरच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world