Assembly Election 2024 : 'विदर्भ फॅक्टर' निर्णायक, माजी आणि भावी मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याचा होणार फैसला

Assembly Election 2024  महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात विदर्भ हे सत्तेचे दार समजले जाते.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

Assembly Election 2024 :  महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात विदर्भ हे सत्तेचे दार समजले जाते. विदर्भ जो जिंकेल तोच राज्यही जिंकतो असं मानलं जातं.  चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा) आणि नाना पटोळे (काँग्रेस) हे प्रमुख राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष भाजपाचे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तसंच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar) देखील विदर्भाचे आहेत. विदर्भाची राजधानी असलेलं नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) मुख्यालय आहे. इशान्य महाराष्ट्रातील हा भाग राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा असल्यानं इथं नेहमीच चुरशीच्या निवडणुका होतात. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं विदर्भात नेमकी काय परिस्थिती आहे हे समजून घेऊया

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लोकसभा निवडणुकीत काय झालं?

विदर्भात रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, अकोला, यवतमाळ-वाशिम, वर्धा, अमरावती बुलडाणा आणि नागपूर हे दहा लोकसभा मतदारसंघ येतात. यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तारुढ महायुतीला विदर्भात मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीनं दहापैकी सात जागा जिंकल्या. तर महायुतीला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागलं. सुधीर मुनगंटीवार आणि नवनीत राणा हे भाजपाचे दिग्गज नेते या निवडणुकीत पराभूत झाले. 

विधानसभेत काय परिस्थिती?

विदर्भात एकूण 62 विधानसभा मतदारसंघ आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं त्यापैकी 42 जागा जिंकल्या होत्या. तर महाविकास आघाडीला फक्त 15 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील निकालांच्या आधारावर या मतदारसंघाचा विचार केला तर महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट होतं. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 35 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुतीला फक्त 22 जागांवर आघाडी होती. महायुतीला विदर्भात 41.58 टक्के तर महाविकास आघाडीला 44.82 टक्के मतं मिळाले आहेत. 2019 च्या विधानसभेच्या अगदी उलटं चित्र लोकसभेत दिसलं. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी अधिक होती. 

( नक्की वाचा : एकनाथ खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कधी होणार? बावनकुळेंनी दिलं उत्तर )
 

विदर्भाच्या राजकारणाचं वैशिष्ट्य

विदर्भाच्या निवडणूक रणधुमाळीत भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत असते. शिवसेना, राष्ट्रवादी किंवा मनसे या राजकीय पक्षांना अजून या विभागात स्वत:चा प्रभाव निर्माण करता आलेला नाही.  

Advertisement

विदर्भ 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण गेल्या दहा वर्षात या भागावर भाजपानं वर्चस्व मिळालं आहे. नागपूर मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पासह अनेक शैक्षणिक तसंच आरोग्यविषयक संस्था विदर्भात सुरु करण्यात आल्या आहेत. विदर्भातले गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर हे जिल्हे पूर्वी नक्षलवाद्यांचे केंद्र  होते. पण, 2014 साली राज्यात सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारनं केंद्रीय सुरक्षा दलाच्या मदतीनं नक्षलवादी चळवळीचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे आज या जिल्ह्यांमधील बहुतेक भाग हा नक्षलमुक्त झाला आहे.

माओवाद्यांवर मिळवलेला विजय हा या भागातील भाजापाची मोठी उपलब्धी आहे. नक्षलवाद्यांना हद्दपार केल्यानंतर या भागात उद्योग सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्याचा फायदा स्थानिकांना रोजगार निर्मितीमध्ये होणार आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : 'मला उद्धव ठाकरेंची विकेट काढायचीच होती', राणेंनी सांगितला मातोश्रीमधील तो किस्सा! )
 

महायुतीची मोठी डोकेदुखी

विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकाविरोधातील रोष हा महायुतीच्या खराब कामगिरीचं मुख्य कारण मानलं जात आहे. विदर्भात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या पिकांना चांगली आधारभूत किंमत देऊन महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचा राग शांत करण्याच्या प्रयत्नात आहे. 

मतदार यादीतील घोळ ही देखील महायुतीसाठी चिंतेची बाब ठरली आहे. 2019 च्या निवडणुकीत मतदान केलेल्या अनेक मतदारांची नावे सध्याच्या यादीतून गायब आहेत.  भाजपने आता मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. निवडणुकीतील यशासाठी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रदेशातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिमेवर भाजपाची भिस्त आहे.

Advertisement

( नक्की वाचा : शिवाजी महाराजांची माफी, सावरकरांचा उल्लेख, मोदींनी कसं बदललं राज्याचं राजकारण? )
 

माजी वि. भावी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून प्रकट झालेला मतदारांचा रोष कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्याचवेळी या निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. 2019 झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात फक्त 1 जागा जिंकता आली होती. पाच वर्षांनी लोकसभेच्या 13 जागा जिंकत काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या यशानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समर्थकांनी त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे.