
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जवळ 11 पक्षाच्या नेत्यां बरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात 288 विधानसभा मतदार संघ आहेत. विधानसभा निवडणुकीला जास्तात जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. शिवाय शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. मात्र याची घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 95 लाख ऐवढी आहे. तर महिला मतदारांची संख्या ही 4 कोटी 64 लाख आहे. तृतीयपंथी 5 हजार 997 तर दिव्यांग 6 लाख 32 हजार मतदार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे मतदार 19 लाख 48 हजार येवढे आहेत, अशी माहिती ही यावेळी राजीव कुमार यांनी दिली. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शहरी भागात झालेल्या कमी मतदानाबद्दल निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली. कुलाबा, कल्याण, पुणे कमी मतदान झाले. त्या तुलनेत आदिवासी बहूल गडचिरोलीत सर्वात जास्त मतदान झाल्याची बाब त्यांनी सांगितली. विधानसभेला आता जास्तीत जास्त मतदान करावे असा आवाहन त्यांनी यावेळी केले.
या निवडणुकीत सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. खोटे व्हिडीओ पसरवले जातात. त्यावरही लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीत सभा स्थळावरून वाद होत असतात. त्यामुळे जो पहिला अर्ज करेल त्याला सभेचे ठिकाण द्यावे असेही सांगण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केले. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार असेल तर त्याची माहिती वर्तमान पत्रातून एकदा नाही तर तीन तीन वेळा द्यावी लागेल असे ही राजीव कुमार यांनी यानिमित्ताने सांगितले.
लोकसभा निवडणुकी दरम्यान 4 हजार कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर तपास यंत्रणाचेही लक्ष राहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रचारा दरम्यानही जर कोणी विमान किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करत असेल अशा वेळी काही तपासणी करायची असल्यास त्याचीही मुभा राहील असे ते म्हणाले. दरम्यान चिन्ह वाटपाचा वाद सध्या कोर्टात आहे. त्यावर बोलणे निवडणूक आयुक्तांनी टाळले आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येकाला मतदान करता येईल याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान राज्या विधानसभा निवडणुकीची तारीख लवकरच घोषीत केली जाईल असे त्यांनी सांगितले. शिवाय ती किती टप्प्यात होईल याचीही माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले. आजच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार की नाही याची उत्सुकता होता. मात्र तसे झाले नाही. आयोगाने निवडणूक तयारीचा घेतलेला आढावा याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याचे सस्पेन्स अजूनही कायम आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world