दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव का झाला? याची कारणं आता शोधली जात आहेत. इंडिया आघाडीत एकत्र असलेले आप आणि काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळी चुल मांडली. त्याचा फटका बसल्याचे या निवडणुकीत स्पष्ट दिसून येत आहेत. काँग्रेसमुळेच आपची दिल्लीतील सत्ता गेली हे आता प्रथमदर्शनी दिसत आहे. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोन्ही नेत्यांनी जर आपला इगो बाजूला ठेवला असता तर निकाल निश्चित वेगळे असते. हे आम्ही म्हणत नाही तर इंडिया आघाडीचेच नेते आता म्हणत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपासारखं कडवं आव्हान समोर असताना आम आदमी पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे लढले. याचाच परिणाम म्हणजे 'आप'वर स्वतःचाच बालेकिल्ला गमवण्याची वेळ आली. काँग्रेसने स्वबळावर दिल्ली विधानसभा निवडणूक लढल्यामुळे आपचा 17 जागांवर पराभव झाला आहे. यात राजेंद्र नगर, संगम विहार, नरेला, तिमारपूर, आदर्शनगर, बादली, मादीपूर, विकासपुरी,द्वारका, नवी दिल्ली, जंगपुरा, कस्तुरबा नगर, मालविया नगर, मेहरौली, छतरपूर, त्रिलोकपुरी, मुस्तफाबाद या मतदार संघांचा समावेश आहे. या ठिकाणी काँग्रेसला मिळाली मतं पाहात जर आघाडी झाली असती तर आप किंवा काँग्रेसने या जागा जिंकल्या असत्या अशी स्थिती होती.
काँग्रेसच्या उमेदवारांचा फटका आपच्या जेष्ठ नेत्यांनाही बसला आहे. आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदार संघातून चार हजार मतांनी पराभूत झाले. त्याच वेळी या मतदार संघात काँग्रेसच्या संदीप दिक्षित यांनी जवळपास साडेचार हजार मते घेतली आहे. केजरीवाल यांच्या प्रमाणे आपचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला. ते केवळ 600 मतांनी पराभूत झाले. याच मतदार संघात काँग्रेसचे फरहाद सुरी यांनी जवळपास साडेसात हजार मतं मिळाली आहेत. त्यामुळे सिसोदीया यांना ही निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दिल्लीतल्या पराभवानंतर इंडिया आघाडीतली धुसफूसही चव्हाट्यावर आली आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीतल्या याच बेबनावर निशाणा साधला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर एक मिम शेअर केलं आहे. त्यात महाभारतातील एका साधूचा व्हिडीओ शेअर करत 'और लडो आपस मै', असं म्हणत आप आणि काँग्रेसच्या संघर्षावर टीका केली आहे. दिल्लीतल्या निकालानंतर आता इंडिया आघाडीत कश्मीर ते कन्याकुमारी वादाचे फटाके फुटायला सुरूवात झालीय. राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं पाहिजे, आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती तर चित्र वेगळं असतं असं संजय राऊत म्हणाले आहेत.
2020 साली काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत 4.3 टक्के मतं पडली होती. आपला 53.8 टक्के मतं आणि भाजपला 38.7 टक्के मतं पडली होती. या निवडणुकीत भाजपला दिल्ली विधानसभेचं लक्ष्य गाठण्यासाठी केवळ 5 ते 7 टक्के मतदान आपल्याकडे ओढायचं होतं. हेच भाजपनं हेरलं. काँग्रेसने केजरीवालांच्या आपची 2 ते सव्वा दोन टक्के मतं आपल्याकडे खेचली. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीचा आकडा 4.3 वरून 6.3 टक्क्याच्या वर गेला. हीच काय ती काँग्रेससाठी दिलासा देणारी गोष्ट ठरली. दुसरीकडे भाजपाने आखलेल्या रणनीतीमुळे भाजपाची मतांची टक्केवारी 38.7 टक्क्यांवरून 45.7 टक्क्यांवर नेली.
ट्रेंडिंग बातमी - Parvesh Varma : अरविंद केजरीवाल यांना पाडणारे 'जायंट किलर'; कोण आहेत परवेश वर्मा?
आम आदमी पक्षाच्या पराभवात काँग्रेसचा वाटा मोटा असल्याचं आता बोललं जात आहे. शिवाय काँग्रेसने एक प्रकारे जुने हिशोबही या निमित्ताने चुकते केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहेत. 2014 साली केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनीच काँग्रेस सरकार विरोधात भ्रष्टाचाराचे रान उठवले होते. त्याचा फटाक काँग्रेसला बसला. काँग्रेस सत्तेतून बाहेर फेकली गेली. हा राग काँग्रेसच्या मनात होता. शिवाय नुकत्याच झालेल्या हरियाणा निवडणुकीतही आपने अपशकून केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. आपमुळे हरियाणातील सत्ता येता येता राहून गेली. याचा हिशोब या दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने काँग्रेसने चुकता केला अशी आता चर्चा राजधानीत आहे.