राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नोमानी यांच्यावर आरोप करतानाच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडी (MVA) वर मतदारांमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा गंभीर आरोप केला आहे. शुक्रवारी फडणवीस यांनी खडकवासल्याचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये बोलताना त्यांनी ‘वोट-जिहाद' चा मुकाबला करण्यासाठी ‘मतांच्या धर्मयुद्धा' ची आवश्यकता असल्याचे म्हटले. या सभेनंतर फडणवीसांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी यही समय है सोए हुओं को जगाने का! असे म्हटले होते.
शनिवारी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी म्हटले की, "उलेमा काऊन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी 17 मागण्या महाविकास आघाडीला दिल्या होत्या, या मागण्या भयानक आहेत. मुसलमानांना 10 टक्के आरक्षण द्या. 2012-2024 दरम्यान ज्या दंगली झाल्या त्या दंगलीतील मुस्लिम आरोपींवरील खटले मागे घ्या, आरएसएसवर बंदी घाला; अशा मागण्या केल्या आहेत. मविआतील पक्षांनी पत्र देऊन त्या मागण्या मान्य करू असे सांगितले आहे. हे सज्जाद नोमानी अपील करत आहेत की वोट जिहाद करा. ते सांगत आहेत की आमच्या वोट जिहादचे सिपेह सालार शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राहुल गांधी आहेत. आम्ही देशाच्या इतिहासात निवडणुकीत इतके लांगुलचालन कधीही पाहिले नव्हते. मतांचे विभाजन करण्यासाठी, अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी विरोधी पक्ष काम करत असतील तर त्याविरोधात सगळ्यांना एक व्हावेच लागेल. "
नक्की वाचा : 'धार्मिक कलह..', वोट जिहादवरुन शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले
भाजपला मतदान करणाऱ्या मुसलमानांवर बहिष्काराचे अपील?
फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, "मूठभर मतांवर तुम्ही निवडून येऊ शकता असे वाटत असेल तर बहुसंख्य मतांना देखील पुन्हा विचार करावा लागेल, एकत्र यावे लागेल. नोमानींचा दुसरा व्हिडीओ आला आहे. यात त्यांनी म्हटलंय की काही लोकांनी लोकसभेत मुस्लिम समाजाच्या लोकांनी भाजपला मतदान केले त्यांना शोधून काढा आणि त्यांच्यावर बहिष्कार करा. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी लोकं त्यावर काहीही बोलायला तयार नाही. हा गुन्हा आहे, तुम्हाला कोणाला बहिष्कार घालता येत नाही म्हणून सोमय्या यांनी निवडणूक आयोगाने यासंदर्भात तक्रार केली आहे."
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) वर मतदारांमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी ‘वोट-जिहाद' चा मुकाबला करण्यासाठी ‘मतांच्या धर्मयुद्धा' ची आवश्यकता असल्याचे म्हटले. नोमानी यांच्यावर टीका करताना फडणवीस यांनी खडकवासल्याच्या सभेत म्हटले होते की, “निवडणुकीदरम्यान काही जण मतदारांमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महायुती सरकारने लागू केलेल्या ‘लाडकी बहीण योजना' सारख्या योजना सर्व महिलांसाठी आहेत. आम्ही कधीच धर्माच्या आधारे भेदभाव केला नाही.”