Exclusive : एकनाथ शिंदेच्या बंडाची ठिणगी कधी पडली? फडणवीसांनी सांगितली 'त्या' रात्रीची गोष्ट

जाहिरात
Read Time: 2 mins
Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची संपूर्ण गोष्ट फडणवीसांनी सांगितली आहे.
मुंबई:


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्यापूर्वी NDTV मराठीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी 2021 साली तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह मुंबईहून आधी सुरत आणि नंतर गुवाहटीमध्ये गेले. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडाची ठिणगी कधी पडली? याची एक्सक्लुझिव्ह माहिती देवेंद्र फडणवीस यांनी 'NDTV मराठी' च्या खास कार्यक्रमात बोलताना दिली आहे. 

काय म्हणाले फडणवीस?

राज्यात 2021 साली झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या आदल्या दिवशी  शिंदे साहेबांना बाहेर बसवण्यात आलं होतं. तुम्ही बाहेर बसा आणि आमदारांनी एक-एक करुन भेट घ्यायची असं सांगण्यात आलं. त्यावेळी खऱ्या अर्थानं अंतिम ठिणगी पडली. अनेक आमदार शिवसेनेचे मला म्हणाले, भाऊ काही तरी करा आम्ही हा अपमान सहन करु शकत नाही, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी 'NDTV मराठी' वर बोलताना दिला.

फडणवीस यांनी यावेळी बोलताना विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी काय घडलं त्याचा घटनाक्रम देखील सांगितला. 'दुसऱ्या दिवशीही गटनेते शिंदे साहेब होते. त्यांना बाहेर बसवण्यात आलं. आतमध्ये ज्युनिअर, अपरिपक्व नेते बसवले. तो देखील अपमान शिंदे साहेबांनी सहन केला. पण, त्यांच्यासोबतच्या आमदारांनी सांगितलं की आज निर्णय करायचा म्हणजे करायचा. या पुढे अपमान सहन करायचा नाही.  ते निघाले. त्यांनी अर्ध्या रस्त्यानंतर आम्हाला फोन केला आणि सांगितलं देवेंद्रजी मी निघालोय. मी आता निर्णय घेतलाय. मी निघालोय. मी त्यांना सांगितलं काळजी करु नका. तुम्हाला काही होणार नाही याची जबाबदारी माझी. जा पुढे, आम्ही इकडचं सांभाळतो. 

( नक्की वाचा : जरांगे फॅक्टरचा सामना कसा करणार? देवेंद्र फडणवीसांनी 'NDTV मराठी' वर सांगितला फॉर्म्युला )

त्यानंतर ते तिकडून निघून गेले. तुम्ही त्यावेळेसची दृश्य पाहिली असतील , तर निकाल लागला. निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी दृश्यांमध्ये दिसतंय. मला एक फोन आलाय. मी बाजूला गेला आणि फोनवर बोललोय. त्यानंतर मी आशिष शेलारांच्या कानात काहीतरी सांगतोय. गिरीश महाजनांच्या कानात सांगतोय. चंद्रकांत दादांच्या कानात सांगतोय. त्यांना मी हेच सांगतोय की असं घडलं आहे. लवकर घरी चला, आपल्याला ठरवावं लागेल, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.