जागावाटपाच्या आखाड्यातील पैलवान, विरोधकांपूर्वी मित्रपक्षांसोबत दोस्तीत कुस्ती

Advertisement
Read Time4 min
जागावाटपाच्या आखाड्यातील पैलवान, विरोधकांपूर्वी मित्रपक्षांसोबत दोस्तीत कुस्ती
मुंबई:

कोणत्याही निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून होणारी भांडणं, त्यातून निर्माण होणारी नाराजी आणि मग होणारी बंडखोरी हे असतंच. आपल्याला हव्या त्या जागा पदरात पाडून घेणं, त्यासाठी आपला सगळा जोर पणाला लावणं हे सगळ्याच पक्षांसाठी आव्हानात्मक काम असतं. असं म्हणतात की एकवेळ

निवडणूक जिंकणं सोपं असतं मात्र जागावाटप हे त्याहून अवघड असतं.  जागावाटपावरून युती, आघाडी मोडल्याची उदाहरणं महाराष्ट्राने आणि देशाने पाहिली आहेत.

महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जागावाटपावरून जोरबैठका सुरू आहेत. या जागावाटपात कोण प्रमुख चेहरे आहेत ते पाहूयात.

देवेंद्र फडणवीस

महायुतीमध्ये भाजपचा जागावाटपामध्ये वरचष्मा असल्याचे सध्याच्या घडीला दिसून येत आहे. जागावाटपाच्या या चर्चेत भाजपतर्फे नेतृत्व करण्याचे काम माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभव आणि वरिष्ठांची मर्जी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. फडणवीस हे मुत्सद्दी राजकारणी असून त्यांनी आतापर्यंत बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपसोबत आणण्यात त्यांचा मोठा हात असून यामुळे ते या दोघांच्या पक्षासोबत अधिकारवाणीने बोलू शकतात. यामुळे त्यांच्यावर या बोलणीसाठीची प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.
       
चंद्रशेखर बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनाही जागावाटपाच्या चर्चेत महत्त्वाचे स्थान दिले जाते. ओबीसी समाजातून येणाऱ्या बावनकुळे यांची ओळख कार्यकर्त्यांशी घट्ट नाळ असणारा नेता अशी आहे.

विदर्भातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांशी अर्थात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्याशी उत्तम संबंध असल्याने बावनकुळे यांच्या शब्दाला भाजपमध्ये वजन आहे असे बोलले जाते.

सुधीर मुनगंटीवार


देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर विदर्भातील आणखी एका नेत्याचा जागावाटपाच्या बैठकीत समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती भूषवलेली आहेत.

राज्याच्या वन खात्याच्या मंत्रिपदाचा भार त्यांच्यावर असून त्यांचाही भाजपच्या जागावाटपासाठीच्या चर्चेत सहभागी असलेल्या निवडक मंडळींमध्ये समावेश आहे.  विचार करून बोलणारे नेते आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवत राजकारण करणे हा त्यांच्या अंगचा गुण असल्याने त्याचा वापर भाजपने जागावाटपाच्या चर्चेत करण्याचे ठरवलेले दिसते आहे.

चंद्रकांत पाटील

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी असलेली जवळीक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून केलेला संघर्ष या चंद्रकांत पाटील यांच्या काही जमेच्या बाजू आहेत. पाटील हे सध्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातून येणारे चंद्रकांत पाटील हे अनेकदा त्यांच्या विधानांमुळे वादात सापडलेले दिसतात. पक्षनेतृत्वाची असलेल्या मर्जीमुळे त्यांच्या विरोधात वातावरण कितीही तापलेले असले तरी ते वादातून सहीसलामत बाहेर निघतात हे आतापर्यंत दिसून आले आहे. असा या चंद्रकांत पाटील यांचाही या जागावाटपाच्या बैठकीत समावेश करण्यात आला आहे.  

आशिष शेलार

मराठा समाजाचे नेते असलेले आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार हे देखील जागावाटपाच्या चर्चेत सहभागी आहेत. गरज पडेल तेव्हा आक्रमक गरज पडेल तेव्हा संयमी भूमिका घेण्यात वाकबगार असलेल्या आशिष शेलार यांनी केंद्रीय नेतृत्वाशीही आपले चांगले संबंध निर्माण केले आहेत. पक्षाला गरजेची असलेली सगळी रसद पुरवण्यास ते तयार असतात. त्यांच्या या गुणांचा वापर करून घेण्यासाठी त्यांचाही जागावाटपासाठीच्या बैठकीत समावेश करण्यात आला आहे.

भाजपच्या या नेत्यांचा जागावाटपाच्या बैठकीत समावेश असला तरी भाजपचे केंद्रीय नेतृत्व खासकरून अमित शहा हे या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यांचा शब्द या जागावाटपामध्ये अंतिम मानला जातो.

एकनाथ शिंदे


शिवसेनेतर्फे जागावाटपाच्या चर्चेत फक्त एकनाथ शिंदे यांचाच समावेश आहे. भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी दिलेली आश्वासने काय होती याची शिंदे यांना कल्पना असल्याने कोणत्या जागा आपल्याकडे राखायच्या आणि कोणत्या जागा सोडायच्या. जागा सोडायच्या असल्यास त्याबदल्यात काय मिळणार याची गणिते शिंदे यांनाच ठाऊक असल्याने ते शिवसेनेतर्फे एकमेव नेते या बैठकीत सामील असतात.

उदय सामंत, दीपक केसरकर, गजानन कीर्तीकर या आणि यासारखे मुरब्बी राजकारणी असलेले किंवा जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वाटाघाटी करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांनाही या बैठकीत स्थान देण्यात आलेले नाही.

अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जागावाटपाच्या बैठकीत अजित पवार हे प्रमुख आहेत. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच भाजपसोबत मिळून सत्तेत सामील होत असताना दिली गेलेली आश्वासने ही अजित पवारांना ठावूक आहेत. त्यानुसार कोणते मतदारसंघ द्यायचे कोणते मतदारसंघ घ्यायचे याची त्यांना कल्पना आहे.

आक्रमक आणि रोखठोक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांसमोर सन्मानजनक जागा आपल्या पदरात पाडून घेत त्या जिंकण्याचे आव्हान असून त्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत.  

प्रफुल्ल पटेल  

दिल्लीतील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले आणि शरद पवारांच्या राजकारणाची शैली जवळून पाहणारे प्रफुल्ल पटेल यांची ओळख राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना संकटमोचक अशी होती.

दिल्लीच्या राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवरून महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज बांधण्यात ते तरबेज आहेत. त्यांच्या या कौशल्याचा वापर करून घेत अजित पवारांनी त्यांनाही जागावाटपाच्या बैठकीत उतरवले.

सुनील तटकरे

अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि राज्याप्रमाणेच केंद्रातील राजकारणाचाही अनुभव घेतलेले सुनील तटकरे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जागावाटपाच्या बैठकीत सामील असतात. पक्षाला जी रसद पुरवायची आहे ती सगळी रसद पुरवण्यात तटकरे वाकबगार असून या कौशल्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात.

आपल्या तोंडून निघणाऱ्या शब्दाचे बरेवाईट परिणाम काय होतील याचा अंदाज घेऊन बोलण्यात पटाईत असलेल्या तटकरेंना त्यांच्या याच गुणांमुळे जागांच्या वाटाघाटीत सामील करून घेण्यात आले आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: