मोठी बातमी : निवडणूक समितीच्या बैठकीतून राहुल गांधी बाहेर पडले! 'उबाठा'ला सोडलेल्या जागेवरून नाराज

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

महाविकास आघाडीच्या जागावाटपचा तिढा सुटला आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. पण, त्यांच्या दाव्याला धक्का देणारी मोठी घटना नवी दिल्लीत घडली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडलेल्या जागेवरुन नाराज आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

कांग्रेस नेत्यांनी वाटाघाटी करताना योग्य भूमिका पार पाडली नसल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी फक्त हे मत व्यक्त केलं नाही. तर ते काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीतून अर्ध्यातून बाहेर पडले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

का राहुल गांधी नाराज?

मुंबई आणि विदर्भातील जागा शिवसेना 'उबाठा'ला सोडल्यामुळे राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याला जागा वाटप करण्यासाठी पाठविले होते. त्यात विदर्भ आणि मुंबईतील काही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडल्याबद्दल राहुल गांधी यांनी नाराजी सर्वांसमोर व्यक्त केली आहे. 

( नक्की वाचा : काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )
 

दरम्यान, मेरिटच्या आधारावर काँग्रेसला जादा जागा मिळायला पाहीजे. विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात जागा मिळायल्या पाहीजे होत्या. आम्ही त्या पक्षांना सांगितलं आहे. राहुल गांधी यांनाही आम्ही या विषयावर स्पष्टीकरण दिलं असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नाही, याची कबुलीच नाना पटोले यांनी यावेळी दिली आहे.

महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात अजून रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाने विदर्भातील 8 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर आणखी चार जागांवर ठाकरे गटाकडून दबावाचं राजकारण सुरु आहे. भंडारा, दक्षिण नागपूर, वरोरा-भद्रावती आणि बल्लारपूर या जार काँग्रेसच्या जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला हव्या आहेत. जागावाटपाच्या प्रश्नावर मित्रपक्षांशी चर्चा होणार असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
 

Topics mentioned in this article