जरांगे फॅक्टरचा सामना कसा करणार? देवेंद्र फडणवीसांनी 'NDTV मराठी' वर सांगितला फॉर्म्युला

मराठवाड्यात महायुतीला विशेषत: भाजपाला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDTV मराठीवरील महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमात या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Devendra Fadnavis on NDTV :  लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपाला मोठा फटका बसला. मराठवाड्यातून भाजपाचा एकही खासदार निवडून आला नाही. सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे यंदाही मराठवाड्यात महायुतीला विशेषत: भाजपाला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NDTV मराठीवरील महाराष्ट्राचा जाहीरनामा या कार्यक्रमात या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

मराठवाड्यात आमची कामगिरी रिपीट करु, आम्हाला मराठा समाजानं व्होट दिलं नाही, हे सांगितलं जातं. त्यांना माझा साधा प्रश्न आहे ज्याांना मराठे मत देणार नाहीत त्यांना 43 टक्के मतं मिळू शकतात का? मराठा समाजाच्या मताशिवाय 43 टक्के मतं मिळू शकतात का? आम्हाला मराठा समाजानं मत दिलं, ओबीसी समाजानं मत दिलं. सर्वांनी मत दिलं, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

एखाद्या मतदारसंघात कमी अधिक प्रमाण ध्रुवीकरण झालं असेल, ते झालं नसेल असं मी म्हणत नाही. मागील वेळी अनेक तत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्या होत्या. दुष्काळ होता. त्याचा फटका सरकारलाच बसतो. लोकांची नाराजी सरकारवर असते. पिकांच्या किंमतीवर परिणाम झाला होता. मराठा आंदोलन सुरु होतं. SC समाजामध्ये आरक्षण जाणार हा समज होता. या सर्व गोष्टी एकत्र आल्या होत्या, त्याचा परिणाम झाला. आज ती परिस्थिती नाही. ही परिस्थिती दूर झाली आहे, असा दावा त्यांनी केला. 

( नक्की वाचा : मुख्यमंत्रिपदाचे 3 चेहरे कोणते? संजय राऊतांनी NDTV मराठीच्या जाहीरनाम्यात सांगितली 'ती' नावं! )
 

जरांगे मलाच टार्गेट करतात - फडणवीस 

जरांगे पाटील मलाच टार्गेट करतात. तेवढं लोकांना त्या मागील डिझाईन लक्षात येतात. आपली लोकं राजकीय परिपक्व आहेत. मतदार तुम्हाला चकीत करणारा निर्णय देतात. एखाद्या व्यक्तीचं जजमेंट त्यावर काय आरोप आहे त्यावर होत नाही. त्याचा भूतकाळ काय यावर ठरतं. लोकांनी पाहिलं, पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले. मराठा आरक्षणाची मागणी 1980 साली झाली. 82 साली अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं, 3 दिवसात आरक्षण दिलं नाही तर मी जीव देईन. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गोळी मारुन घेतली. तेव्हापासून मराठा आरक्षणाची लढाई सुरु आहे. 

चार वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री बनले. त्यांनी आरक्षण दिलं नाही. त्यानंतरच्या तीस वर्षात साडेचार वर्षांचा कालावधी सोडला तर सतत काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी कधीही मराठा आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा मराठा आरक्षण मी मुख्यमंत्री असताना दिलं. मी मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टात आम्ही जिंकलो. सुप्रीम कोर्टात आम्ही टिकवलं. त्यानंतर पुन्हा शरद पवार, उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. त्यांनी आरक्षण घालवलं. पुन्हा शिंदेसाहेब झाले आम्ही पुन्हा आरक्षण दिलं.

( नक्की वाचा : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र )
 

मराठा समाजाचं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ मी पुन्हा सुरु केलं. अण्णासाहेबांचे चिरंजीव असलेल्या नरेंद्र पाटील यांना त्याची जबाबदारी दिली. नरेंद्र पाटील यांनी 1 लाख मराठा तरुणांना रोजगार दिला. हा देशातील रेकॉर्ड आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.