'एका अतृप्त आत्म्यामुळे राज्य अस्थिर' पुण्यातल्या सभेत पंतप्रधानांचा रोख कुणाकडे?

PM Modi Pune Rally : पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे आगामी काळात जोरदार पडसाद उमटणार आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात प्रचारसभा झाली.
पुणे:


लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर आता वाढू लागलाय. दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झालं असून उर्वरित टप्प्यांमधील जागांसाठी सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (29 एप्रिल) रोजी राज्यात तीन ठिकाणी सभा घेतल्या. सोलापूर, सातारा आणि पुणे या ठिकाणी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यापैकी पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचे आगामी काळात जोरदार पडसाद उमटणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी  कुणाचंही नाव न घेता जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले मोदी ?

'मी जे बोलतोय ते कोणी स्वत:हून आपल्या डोक्यावर घेऊ नये. आमच्याकडे म्हणतात की काही अतृप्त आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात त्यांचे आत्मे फिरत राहतात. स्वत:चं काम नाही झालं तर त्यांना इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना आनंद मिळतो. महाराष्ट्रही अशा अतृप्त आत्म्यांचा शिकार झाला आहे.

इथल्या एका मोठ्या नेत्याने 45 वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षेसकाठी या खेळाची सुरुवात केली. तेव्हापासून महाराष्ट्र एका अस्थिरतेच्या काळात गेला. अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. हे विरोधकांनाच अस्थिर करत नाही तर ते आपल्या स्वत:च्या पक्षामध्येही असेच करतात. 

हे आत्मे परिवारातही असेच करतात. 1995 मध्ये भाजप, शिवसेनेचे सरकार आले तेव्हाही हा आत्मा त्या सरकारला  अस्थिर करण्याचे काम करत होती. 2019 मध्ये त्यांनी जनादेशाचा अपमान केला. आज महाराष्ट्रालाच अस्थिर करण्यात संतोष होत नसून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ सुरू आहे. आज देशाला अशा भटकत्या आत्म्यांपासून बचाव करण्यासाठी स्थिर मजबूत सरकारच्या दिशेने पुढे जाणे गरजेचे आहे,' अशी टीका पंतप्रधानांनी  केली.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भगवा दहशतवाद ही काँग्रेसची थिअरी

पंतप्रधांनी या सभेत दहशतवादाच्या मुद्यावर बोलताना विरोधकांना लक्ष्य केलं. काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या तृष्टीकरणाच्या धोरणामुळे देशात दहशतवाद वाढला. काँग्रेसनं निर्दोष हिंदूना टार्गेट करण्यासाठी 'भगवा दहशतवाद' ही थिअरी जन्माला घातली. त्यांनी निर्दोष हिंदूंना जेलमध्ये घधातले आणि त्यांचा झळ केला. मुंबईवर 26/11 ला झालेला हल्ल्या दोषही त्यांच्याच माथी मारण्याची काँग्रेसनं तयारी केली होती. यासिन भटकलला पाठिंबा देणारी वक्तव्यं प्रसिद्ध करणारी हीच मंडळी आहेत. याच लोकांनी याकूब मेमनची फाशी रोखण्यासाठी मध्यरात्री कोर्ट उघडण्यास भाग पाडलं होतं, असं पंतप्रधान म्हणाले.

Advertisement

( नक्की वाचा : Explainer: अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्ये अडकले माजी पंतप्रधानांचे नातू, तक्रार दाखल होताच का सोडला देश? )

बुलेट ट्रेनचा प्रवास ही मोदींची गॅरंटी

पालखी मार्ग, पुणे मेट्रो, समृद्धी महामार्ग, हायस्पीड वंदे भारत ट्रेन, पुणे विमानतळाचा विकास हे सर्व पुण्यात आहे. महाराष्ट्रातील नागरिक लवकरच बुलेट ट्रेनमध्ये प्रवास करतील ही मोदींची गॅरंटी आहे असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपल्याला मोबाईल आयात करावे लागत आता आपण निर्यात करतो. त्या सरकारनं दहा वर्षात केलेला खर्च आम्ही एका वर्षात करतो, असा दावाही पंतप्रधानांनी केला.