ZP Election 2026: राज्यात 7 फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून सांगलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
'आमच्यामुळेच मुख्यमंत्री'
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने खानापूर तालुक्यातील पळशी येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आमदार सुहास बाबर बोलत होते. यावेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते वैभव पाटील यांच्यावर टीका करताना बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला.
सुहास बाबर म्हणाले की, आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. इतकेच नाही तर तुमच्या मुख्यमंत्र्यांना विचारा की सुहास बाबर कोण आहेत, असे खुले आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपा आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे.
( नक्की वाचा : ZP Election 2026 : 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकींची तारीख बदलली; मतदान कधी? वाचा A टू Z माहिती एका क्लिकवर )
'तालुक्यातील सर्वच पक्ष मीच चालवतो'
या सभेत बोलताना सुहास बाबर यांनी केवळ भाजपावरच नाही तर इतर सर्व पक्षांच्या स्थानिक अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खानापूर तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप हे सर्व पक्ष मीच चालवतो, असा दावा त्यांनी केला. मी वरून शांत दिसत असलो तरी एकदा कार्यक्रम करायला लागलो की काय होते हे विट्यातील लोकांना माहीत आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या विरोधकांना इशारा दिला आहे.
गिरीश महाजनचं उत्तर
आमदार सुहास बाबर यांच्या या विधानानंतर भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते गिरीश महाजन यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाजन म्हणाले की, सुहास बाबर ज्या भाषेत बोलत आहेत ती अत्यंत चुकीची आहे. राजकारणात त्यांची ही पहिलीच टर्म आहे आणि ते इतक्या लवकर एकेरी भाषेत बोलत आहेत याचे मला आश्चर्य वाटले.
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीत राजकीय संघर्षाला धार; भाजपा कार्यकर्त्यावरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना अटक )
मीच सर्व पक्ष चालवतो असे म्हणणे हे त्यांचे बालिशपणाचे लक्षण आहे. ते राजकारणात अजून लहान आहेत, त्यांनी राजकारण समजून घेण्याची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांना योग्य समज द्यायला हवी, अन्यथा ही त्यांची शेवटची टर्म ठरू शकते, असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.
मतदानाला काही दिवस शिल्लक असतानाच महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांचे नेते आमनेसामने आल्याने मतदारांमध्ये देखील चर्चेला उधाण आले आहे. सुहास बाबर यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केल्यामुळे आता येणाऱ्या काळात याचे पडसाद निवडणुकीच्या निकालावर कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world