उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबईत पहिली संयुक्त सभा शिवाजी पार्कात होत आहे. या सभेला शिवशक्ती सभा असं नाव देण्यात आलं आहे. या सभेची सुरूवात मनसे नेते संदिप देशपांडे यांच्या भाषणांनी झाली. आपल्या सारख्या कार्यकर्त्याला ठाकरे बंधूंच्या सभेत भाषण करण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य आहे असं ते यावेळी म्हणाले. त्यानंतर त्यांना आपल्या भाषणाचा गिअर चेंज करत भाजप शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला. शिवाय ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे आणि विचार कधी संपत नाही असं म्हणत उपस्थित शिवसैनिक मनसैनिकांकडून टाळ्या आणि शिट्ट्या मिळवल्या.
संदिप देशपांडे यांनी भाजप नेते अण्णामलाई यांच्या समाचार घेतला. त्यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. शिवाय मुंबई महाराष्ट्राची नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं म्हटलं होतं. त्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. इथं येवून कुणी शहाणपणा शिकवायचा नाही. तुमच्या चेन्नईत असे चालेल का असा सवाल त्यांनी केला. लुंगी वाल्यांना सांगायचं आहे वाट्टेल ते बोलू नका. नाही तर उठाव लुंगी बजाव पुंगी असा इशारा त्यांनी दिली. मराठी माणसाला गृहीत धरण्याचा प्रयत्न करु नये अशा थेट इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला. यावेळी उपस्थितीतांनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
नक्की वाचा - Kalyan News: भाजपकडून पैसे वाटप? 3 हजारांची पाकीटं घरा-घरात वाटली, सेना-भाजपात घमासान
मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी अस्मितेचा विषय आहेच. पण तीन वर्षात मुंबई महापालिकेला ज्या पद्धतीने ओरबाडणं सुरू आहे त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे असं ही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी एक खास गोष्टी ही सांगितली. ते म्हणाले मुंबई महापालिकेत मराठी माणसांना दिड लाख लोकांना रोजगार मिळू शकतो. मोदींनी सांगितले तसे रोजगार नाही. खरा रोजगार मिळू शकतो असा टोला त्यांनी लगावला. बीएमसीमध्ये 30 टक्के जागा भरलेल्याच नाहीत अशीच माहिती त्यांनी दिली. त्यातून वर्षाला एक लाख लोकांना रोजगार देता येतील. तसा निर्णय ठाकरे बंधूनी घ्यावा असं ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ठाकरे ब्रँड संपला असं ते म्हणत आहेत. पण ठाकरे हा ब्रँड नाही तो विचार आहे. तो संपत नाही. गुजरातचा जो आहे तो ब्रँड आहे. लोक एखाद्या ब्रँडला कंटाळले की ते तो बदलतात. आता ते तुम्हाला चेंज करणार आहेत. हे गुजरातच्या ब्रँडने लक्षात ठेवावे असं ही देशपांडे यावेळी म्हणाले. निवडणूका आल्या की भूलथापा देण्याचं भाजपचं का आहे. बहीणी आता त्यांच्या लाडक्या झाल्या आहेत. पण आता त्या ही लाडक्या बहीणी हुशार झाल्या आहेत असं ही ते म्हणाले. ठाकरे मराठीसाठी नाही सत्तेसाठी एकत्र आलेत असा आरोप होता. मग भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार तुम्ही तिघ एकत्र गोट्या खेळायला आलात की विटी दांडू खेळायला आलात. असा सवाल त्यांनी केला. मराठी माणसाठी आम्ही एकत्र आलोत. त्यांच्यासाठीच सत्ता राबवणार असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world