S. S. Rajamouli Remark On Hanuman: हनुमानावर केलेल्या विधानामुळे सिनेदिग्दर्शक एसएस राजामौली अडचणीत सापडले आहेत. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी राजामौलींविरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केलीय. राजामौली यांनी हनुमानाबाबत अपमानास्पद विधान केल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केलाय.
राजामौली यांनी नेमके काय विधान केले होते?
17 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे एसएस राजामौली यांच्या 'वाराणसी' सिनेमाच्या ट्रेलर लाँचनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तांत्रिक बिघाडांमुळे कार्यक्रमास उशीर झाल्याबाबत राजामौली म्हणाले होते की, "मी देवावर विश्वास ठेवत नाही, पण तांत्रिक बिघाडामुळे मला माझ्या वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली. वडील म्हणायचे की जेव्हा-जेव्हा तुला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागेल, तेव्हा भगवान हनुमान तुला मदत करतील, पण देव या समस्येत मदत करतो का?"
पत्नी देखील हनुमानभक्त असल्याचा उल्लेख करत राजामौलींनी गंमतीशीर अंदाजात म्हटलं की, आता पाहायचंय की पत्नीचा हनुमान यावेळेस मदत करेल का?
राजमौलींचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालंय आणि त्यांच्यावर चौफेर टीका केली जातेय. त्यांचे हे विधान धार्मिक भावनांचा अपमान आणि हनुमानाप्रति असलेल्या श्रद्धेचाही अपमान असल्याचं म्हटलं जातंय.
तातडीने कारवाईची मागणी
हिंदू सेनेने राजामौली यांचे वक्तव्य गांभीर्याने घेतलंय. विष्णू गुप्ता यांनी दिल्ली पोलिसांकडे चौकशीची मागणी केलीय. तातडीने कारवाईची मागणी करत त्यांनी भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याचीही मागणी केलीय.
(नक्की वाचा: Radhika Bhide New Song Video: 'मन धावतंया' फेम राधिका भिडेची नवी इनिंग, मराठी सिनेमात पार्श्वगायिका म्हणून पदार्पण)
(Content Souce :IANS)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
