जाहिरात

डॉन 3 सिनेमा सोडल्याने Ranveer Singh वर कारवाई! '...हा ट्रेंड धोकादायक बनू शकतो', मोठ्या व्यक्तीचा गंभीर इशारा

Don 3 Controversy Update: 'डॉन 3' सिनेमा ऐनवेळी सोडल्यामुळे अभिनेता रणवीर सिंह आणि फेडरेशन (FWICE) मधील वाद अधिकच वाढला आहे.

डॉन 3 सिनेमा सोडल्याने Ranveer Singh वर कारवाई! '...हा ट्रेंड धोकादायक बनू शकतो', मोठ्या व्यक्तीचा गंभीर इशारा
"Ranveer Singh Don 3 Controversy: डॉन 3 सिनेमा आणि रणवीर सिंह वाद नेमका काय आहे?"
Ranveer Singh Instagram

Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि 'डॉन 3' सिनेमावरून सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. या प्रकरणात आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) देखील कठोर भूमिका घेतली आहे. सिनेमाचा निर्माता फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर फेडरेशनने रणवीर सिंहविरुद्ध 'नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह' म्हणजेच असहकाराचे निर्देश जारी केले आहेत. दरम्यान FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी 'आयएएनएस'शी (IANS) बोलताना हे संपूर्ण प्रकरण सविस्तर पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि इंडस्ट्रीतील या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता देखील व्यक्त केली.

अशोक पंडित 'IANS'शी बातचित करताना म्हणाले की,"सिनेसृष्टी ही विश्वासावर चालणारी एक व्यवस्था आहे. येथे जेव्हा एखादा निर्माता एखाद्या अभिनेत्याला साइन करतो, तेव्हा संपूर्ण टीम त्यानुसारच काम सुरू करते. सिनेमाची पूर्वतयारी, शूटिंगचे नियोजन, लोकेशन, टेक्निकल टीम, सेट आणि इतर सर्व गोष्टींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात."

"...इंडस्ट्रीसाठी एक धोकादायक ट्रेंड बनू शकतो"

अशोक पंडित म्हणाले की, "जशी एखाद्या सिनेमाची पूर्वतयारी सुरू होते, तसा निर्मात्याचा पैसा सतत खर्च होऊ लागतो. अशा परिस्थितीत जर एखादा अभिनेता ऐनवेळी सिनेमा सोडत असेल, तर त्याचा फटका केवळ निर्मात्यालाच बसत नाही तर शेकडो कामगार आणि तंत्रज्ञांनाही बसतो. ते पुढे म्हणाले की, 'डॉन 3' सिनेमाची तयारी बरीच पुढे गेली होती. शूटिंगचे नियोजन पूर्ण झाले होते आणि युनिट निघण्याच्या तयारीतच होते. पण त्याच वेळी रणवीर सिंहने अचानक प्रोजेक्टमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. कारण काहीही असो, पण अशा प्रकारे ऐनवेळी सिनेमा सोडणे इंडस्ट्रीसाठी एक धोकादायक ट्रेंड बनू शकतो".

(नक्की वाचा: Ranveer Singh Banned: रणवीर सिंहचं करिअर धोक्यात? 3 वर्षे मेहनत आणि 45 कोटी पाण्यात? 'डॉन 3' सोडल्यामुळे 4 लाख कर्मचाऱ्यांचा असहकार)

रणवीर सिंहसोबतचे संवादाचे प्रयत्न ठरले अपयशी

अशोक पंडित म्हणाले, "जेव्हा हे प्रकरण आमच्याकडे आले, तेव्हा फेडरेशनने आधी ते शांततेत सोडवण्याचा प्रयत्न केला. रणवीर सिंहला बोलावून त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. फेडरेशनने त्याला अनेकदा नोटीस आणि रिमाइंडर्स पाठवले, पण त्याच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. नंतर जेव्हा पत्रकार परिषदेची घोषणा झाली, तेव्हा रणवीरच्या टीमकडून एक ईमेल पाठवण्यात आला, ज्याने फेडरेशनचे समाधान झाले नाही."

पंडित पुढे असे म्हणाले की, "फेडरेशनची इच्छा होती की रणवीर सिंहने स्वतः समोर येऊन बोलावे, कारण इतके मोठे प्रकरण केवळ मॅनेजर किंवा प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकत नाही. हा केवळ एका सिनेमाचा विषय नाही, तर संपूर्ण इंडस्ट्रीच्या विश्वासाशी आणि काम करण्याच्या पद्धतीशी जोडलेला मुद्दा आहे. इंडस्ट्री ही भावनिक बंध (इमोशनल बॉन्डिंग) आणि विश्वासावर काम करते. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि टेक्निशिअन एकमेकांवर विश्वास ठेवून काम करतात. जर हा विश्वास तुटू लागला, तर भविष्यात निर्माते कोणत्याही मोठ्या स्टारवर गुंतवणूक करण्यास घाबरतील. यामुळे संपूर्ण इंडस्ट्री प्रभावित होऊ शकते. हा एक धोकादायक ट्रेंड बनू शकतो."

(नक्की वाचा: Extortion News: आधी डान्सर म्हणून भेटल्या, नंतर रचले भयंकर जाळं; प्रसिद्ध मराठी गायकाला धमकावत मागितले लाखो रुपये)

असहकार आदेशाचा नेमका अर्थ काय?

FWICE ने रणवीर सिंहविरुद्ध नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केला आहे. याचा अर्थ असा आहे की, फेडरेशनशी जोडलेले सदस्य, टेक्निशिअन  आणि कामगार सध्या रणवीर सिंह किंवा त्याच्या प्रोजेक्ट्ससोबत सहकार्य करणार नाहीत. तसेच निर्मात्यांच्या संघटनांनाही या प्रकरणात साथ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण वाद?

हा संपूर्ण वाद 'डॉन 3' सिनेमाशी संबंधित आहे. या सिनेमाची घोषणा वर्ष 2023 मध्ये झाली होती आणि यात रणवीर सिंहला मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आले होते. सुरुवातीला अभिनेत्री कियारा अडवाणी देखील या सिनेमाचा भाग होती, पण नंतर तिने प्रेग्नेन्सी आणि ब्रेकमुळे हा प्रोजेक्ट सोडला. यानंतर सिनेमाचे शूटिंग सतत पुढे ढकलले जात राहिले. रिपोर्ट्सनुसार रणवीर सिंहला स्क्रिप्टमध्ये काही बदल हवे होते, पण मेकर्स (निर्माते) यासाठी तयार नव्हते. याच दरम्यान रणवीरने सिनेमा सोडला. यानंतर फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या 'एक्सेल एंटरटेनमेंट' या कंपनीने दावा केला की त्यांचे सुमारे 45 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हा वाद मिटवण्यासाठी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी प्रयत्न केल्याचे म्हटलं जातंय. अगदी आमिर खाननेही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, पण यातून कोणताही तोडगा निघू शकला नाही.

(Content Source:IANS)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com