Ram Mandir donation theft: अयोध्या येथील राम मंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हाती काही खळबळजनक माहिती लागली असून, थेट प्रभू रामललाचा हिरेजडित हार आणि सोन्या-चांदीच्या चरण पादुका देखील चोरीला गेल्याची मोठी शंका उपस्थित केली जात आहे. या हायप्रोफाईल चोरीप्रकरणी मंदिराचे पुजारी, टिन्नू यादव यांच्यासह अनेक बड्या व्यक्ती संशयाच्या चक्रात आल्या आहेत. एसआयटीने आपली चौकशीची चक्रे कमालीची वेगवान केली असून, संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे.
काय आहे नवे अपडेट?
या प्रकरणाचा तपास करताना एसआयटीने गोपाळ राव आणि टिन्नू यादव यांची पुन्हा एकदा चौकशी केली आहे. याशिवाय राम मंदिराच्या पुजाऱ्यांकडेही हिरेजडित हार आणि चरण पादुकांबद्दल विचारपूस करण्यात आली. त्यावर पुजाऱ्यांनी सांगितले की, हार आणि चरण पादुका प्रभू रामललाला परिधान केल्यानंतर ते टिन्नू यादव यांच्याकडे परत सुपूर्द करण्यात आले होते.
दुसरीकडे, टिन्नू यादव याने दावा केला आहे की, या दागिन्यांना वितळवून सोन्याच्या विटा बनवण्याचे ठरले होते. परंतु, दागिने ठेवण्याची जबाबदारी असलेल्या कृष्ण देव तिवारी यांच्याकडे चौकशी केली असता, तिथे ना सोन्याची वीट सापडली ना दागिन्यांची कोणतीही पावती मिळाली. या गोंधळामुळे चोरीचा संशय अधिकच बळावला आहे.
( नक्की वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराच्या पैशांवर डल्ला मारणारे 6 संशयित कोण? SIT चौकशीत मोठे मासे अडकणार! )
पाच डझनांहून अधिक जणांची चौकशी
मंदिर प्रशासनातील सुरक्षा आणि पारदर्शकता तपासण्यासाठी एसआयटीकडून सध्या सीसीटीव्ही फुटेज, बँकिंग रेकॉर्ड, डिजिटल डेटा आणि संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जात आहे. आतापर्यंत ६० हून अधिक कर्मचारी, सेवेकरी आणि चढाव्याची मोजणी करणाऱ्या लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे. काही संशयितांची विधाने जुळवून पाहण्यासाठी त्यांची एकापेक्षा जास्त वेळा चौकशी करण्यात आली आहे.
एसआयटीने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांना थेट चेन्नईवरून बोलावून घेत त्यांची अनेक तास चौकशी केली. चढाव्याची रक्कम गोळा करण्यापासून ते बँकेत जमा करण्याच्या प्रक्रियेत कुठे गडबड झाली आहे का, याचा शोध अधिकारी घेत आहेत. मात्र, काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने एसआयटीसमोर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
( नक्की वाचा : RSS ला पैसा नक्की कुठून मिळतो? गुरुदक्षिणेवर टॅक्स का लागत नाही? कसं चालतं संघाचं काम? वाचा सर्व माहिती )
15 दिवस थांबा, मुख्यमंत्र्यांचे रामभक्तांना आवाहन
राम मंदिरातील चढावा चोरीचा हा वाद समोर आल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर पहिली थेट प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्याचा दौरा केला आणि रामभक्तांना आश्वस्त करताना म्हटले की, सर्वांनी केवळ 15 दिवस धीर धरावा, काळजी करण्याची काहीही गरज नाही. ट्रस्टच्या विनंतीवरूनच सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले असून, तपास पूर्ण झाल्यावर संपूर्ण सत्य जनतेसमोर येईल आणि कोणताही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही.
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर थेट निशाणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांना एसआयटीचा अंतिम अहवाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारची अनावश्यक वक्तव्ये न करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही पुराव्याशिवाय कोणाचीही नाहक बदनामी करू नका, असे सांगताना त्यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचे नाव न घेता टोला लगावताना ते म्हणाले की, जे लोक रामभक्तांचा अपमान करायचे आणि माफियांच्या थडग्यावर जाऊन प्रार्थना करायचे, त्यांनी आता आम्हाला रामभक्ती शिकवण्याची गरज नाही. सध्या राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून एसआयटीच्या अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world