
या गावात ब्राह्मणांना पूजा-पाठ करण्यास मनाई आहे! तसं करताना आढळल्यास तो दंडास पात्र असेल. अशा पद्धतीचे फलक बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील एका गावात प्रवेश केल्यास, तुम्हाला ठिकठिकाणी दिसतील. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका कथावाचकासोबत घडलेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी गावात ठिकठिकाणी असे फलक लावले आहेत. ज्या ब्राह्मणांना वेदांचे ज्ञान नाही आणि जे मांस आणि दारूचे सेवन करतात, अशा ब्राह्मणांना ते विरोध करत आहेत असं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इटावामध्ये एका ओबीसी (यादव) कथावाचकाशी झालेल्या गैरवर्तनानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामुळेच मोतिहारी जिल्ह्यातील आदापूरच्या टिकुलिया गावात लोकांनी ब्राह्मण पुजाऱ्यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. आदापूरच्या टिकुलिया गावात ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावर ब्राह्मण पुजाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घालणारा फलक लावला आहे. गावातल्या विजेच्या खांबांवरही अशा प्रकारचे फलक लावलेले आढळतात. तरा गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या घराबाहेरही अशा पद्धतीचेच फलक लावले आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, जे वेदांचे जाणकार आहेत, ते कोणत्याही जातीचे असले तरी त्यांना ते पाठिंबा देतात. मात्र ज्या ब्राह्मणांना वेदांचे ज्ञान नाही, अशांना ते विरोध करत आहेत.
मोतिहारी जिल्ह्यातील हे गाव ओबीसी (OBC) आणि ईबीसी (EBC) बहुल आहे. म्हणजेच, येथे बहुतेक लोक मागासलेल्या आणि अति-मागासलेल्या जातीचे आहेत. या गावात ब्राह्मण वस्ती नाही, पण आजूबाजूला अनेक अशी गावे आहेत, जिथे ब्राह्मण वस्ती आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ते सर्व ब्राह्मणांना विरोध करत नाहीत, पण ज्यांना वेद इत्यादींचे ज्ञान नाही, त्यांच्याकडून ते पूजा-पाठ करून घेण्यास इच्छूक नाहीत. विरोधात बोर्ड लावल्यापासून या गावात ब्राह्मणांचे येणे बंद झाले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, वेदांचे आणि कथेचे ज्ञान असूनही इटावामध्ये कथावाचकाचा ज्या प्रकारे अपमान करण्यात आला, त्याचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world