Double Murder: कोणत्याही मुलांसाठी त्याचे आई-वडील हे सर्वस्व असतात. त्यांना सुखात ठेवण्याची धडपड ते करत असतात. पण, काही वेळा नात्यांना काळीमा फासणाऱ्या भयंकर घटना घडतात. ज्यावर सहजासहजी कुणालाही विश्वास बसत नाही.कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका अंतिम वर्षातील तरुणीने आधी स्वतःच्या आईची अपघाताचा बनाव रचून हत्या केली. आता तिच्यावर वर्षभरापूर्वी आजारी असलेल्या वडिलांचाही काटा काढल्याचा थेट आरोप होत आहे. एकाच घरातील दोन व्यक्तींचा विशेष म्हणजे स्वत:च्या आई-बापाचा जीव घेणाऱ्या या मुलीच्या कृत्याने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
ही थरारक घटना जयपूर येथे उघडकीस आली आहे. येथील कोर्टात कारकून म्हणून काम करणाऱ्या नीरज शर्मा यांचा 3 जुलै रोजी एका वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने चिरडल्यामुळे मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ रस्ता अपघात वाटत होता, पण पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा नीरज शर्मा यांची मुलगी आयुषी हिनेच आईच्या हत्येची पूर्ण स्क्रिप्ट लिहिल्याचे समोर आले.
या भयंकर कटात तिला तिचा चुलत भाऊ बलराम याने साथ दिली होती. आईचा अपघात दाखवून खून करण्यासाठी त्यांनी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत, आकाश, मोहित, अरविंद आणि रोहित या 5 कंत्राटी मारेकऱ्यांना आधीच बेड्या ठोकल्या आहेत.
( नक्की वाचा : मॅडमने डावललं, कोणीच ऐकलं नाही! हतबल झालेल्या 9 वर्षांच्या मुलीचा शेवटचा प्रवास CCTV मध्ये कैद, पाहा VIDEO )
काय आहे हत्येचे कारण?
नीरज शर्मा यांचे पती विजय शर्मा हे कोर्ट मास्तर होते. त्यांच्या निधनानंतर नीरज शर्मा यांना अनुकंपा तत्त्वावर कोर्टात सरकारी नोकरी मिळाली होती. पोलिसांच्या तपासानुसार, आयुषीला तिच्या आईच्या जागी ती सरकारी नोकरी हवी होती, तसेच कुटुंबाच्या संपूर्ण मालमत्तेवरही डोळा होता. याच संपत्ती आणि नोकरीच्या हव्यासापोटी आयुषी, तिचा चुलत भाऊ बलराम आणि त्याचे वडील मोहन यांनी मिळून नीरज शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता.
हत्या केल्यानंतर संपत्तीचे आपापसात समसमान वाटप करण्याचे त्यांचे ठरले होते. यापूर्वीही आयुषीने आईला मारहाण केली होती आणि ती काही काळापासून काका मोहन आणि चुलत भाऊ बलराम यांच्यासोबतच राहत होती. पोलीस तपासात आयुषी आणि बलराम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले आहे.
( नक्की वाचा : Tukaram Mundhe यांच्या आदेशाला थेट आव्हान? परवाना रद्द होऊनही सुरूय शिर्डीच्या मोठ्या दूध केंद्राचा कारभार )
वडिलांच्या मृत्यूचे रहस्य आणि मामाचे धक्कादायक आरोप
नीरज शर्मा यांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच, आता या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी थेट पोलिसांत धाव घेत आयुषीनेच तिच्या वडिलांचीही हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. गेल्या वर्षी आजारपणाने मरण पावलेले विजय शर्मा यांना जेव्हा ब्रेन स्ट्रोक आला होता, तेव्हा आयुषी आणि बलराम यांनी त्यांना एका अज्ञात रुग्णालयात दाखल केले होते.
तब्बल 3 महिने त्यांनी कुटुंबाला उपचारांबाबत पूर्णपणे अंधारात ठेवले होते. आईने वारंवार जाब विचारल्यानंतर त्यांनी वडिलांना घरी आणले, मात्र तोपर्यंत त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. आयुषीनेच वडिलांची फीडिंग ट्यूब म्हणजेच अन्नाची नळी काढून घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप आता मामाने केला आहे.
महिनाभरापूर्वीही झाला होता हत्येचा प्रयत्न
नीरज शर्मा या जेव्हा त्यांच्या लहान मुलाला कोचिंग सेंटरमध्ये सोडून परत येत होत्या, तेव्हा वेगाने आलेल्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली होती. विशेष म्हणजे, कंत्राटी मारेकऱ्यांनी महिनाभरापूर्वीही नीरज शर्मा यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्यामुळे त्यांचा तो पहिला प्रयत्न अपयशी ठरला होता. सध्या मुख्य आरोपी आयुषी पोलीस कोठडीत असून पोलीस तिची कसून चौकशी करत आहेत.
दुसरीकडे, या संपूर्ण कटातील मुख्य सूत्रधार असलेला तिचा चुलत भाऊ बलराम अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मामाच्या नवीन आरोपानंतर पोलीस आता वडिलांच्या मृत्यूच्या अँगलनेही या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world