
Kannada novelist S. L. Bhyrappa passes away: ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि तत्त्वज्ञ एस. एल. भैरप्पा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. 'पद्मभूषण' आणि 'पद्मश्री' सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवलेल्या भैरप्पा यांनी 'पर्व' आणि 'आवरण' यांसारख्या वादग्रस्त आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. बंगळूरु येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी बुधवारी (24 सप्टेंबर) दुपारी वाजता अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
तपस्वी भैरप्पा
पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित एस. एल. भैरप्पा हे भारतीय साहित्यातील एक मोठे नाव होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या, जसे की 'वंशवृक्ष', 'दाटू', 'पर्व', 'मंदरा' आणि 'गृहभंग' कन्नड साहित्यात क्लासिक्स मानल्या जातात. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'वंशवृक्ष' (1965) आणि 'गृहभंग' (1970) यांसारख्या कलाकृती विशेष प्रसिद्ध आहेत. 'पर्व' (1979) ही महाभारताची नवीन आवृत्ती म्हणून ओळखली जाते.
भैरप्पा यांच्या अनेक साहित्यकृतींचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकाही तयार झाल्या आहेत. 'वंशवृक्ष', 'नायी-नेरळू', 'मतदाना', आणि 'तब्बलियु नीनाडे मगने' यांसारख्या कादंबऱ्यांवर प्रसिद्ध दिग्दर्शक बी. व्ही. कारंथ, गिरीश कर्नाड आणि गिरीश कासरवल्ली यांनी चित्रपट तयार केले. हे चित्रपट भारतीय समांतर चित्रपट चळवळीतील महत्त्वाचे भाग बनले.
In the passing of Shri S.L. Bhyrappa Ji, we have lost a towering stalwart who stirred our conscience and delved deep into the soul of India. A fearless and timeless thinker, he profoundly enriched Kannada literature with his thought-provoking works. His writings inspired… pic.twitter.com/ZhXwLcCGP3
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2025
भैरप्पा यांना मिळालेले पुरस्कार
भैरप्पा यांना त्यांच्या साहित्यसेवेसाठी अनेक मोठे पुरस्कार मिळाले. 'मंदरा' (2001) या कादंबरीसाठी त्यांना 2010 साली प्रतिष्ठित सरस्वती सन्मान मिळाला होता. याशिवाय, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मश्री (2016) आणि पद्मभूषण (2023) यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरवण्यात आले होते.
( नक्की वाचा : Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांचे निधन, शिवचरित्राला नवी ओळख देणारा तपस्वी हरपला )
हिंदुत्ववादी विचारसरणी
भैरप्पा त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या 'आवरण' (2007) या कादंबरीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता, ज्यात मुस्लिम शासक आणि धर्मांतराच्या मुद्द्यांवर परखड भाष्य करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world