
Stampede in Tamil Actor Vijay Rally: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि राजकीय नेते विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या रॅलीमध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. तामिळनाडूच्या करूर येथे आयोजित केलेल्या या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरीत (Stampede) आतापर्यंत किमान 31 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तर अनेक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता स्थानिक प्रशासनाने वर्तवली आहे.
नेमकं काय झालं?
अभिनेता विजय यांच्या सभेसाठी करूर येथे नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. याच मोठ्या गर्दीतून अचानक चेंगराचेंगरी झाली. प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 3 मुलांसह किमान 10 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, परंतु स्थानिक माध्यमांनी आतापर्यंत एकूण 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्या अनेकांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या करूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चेंगराचेंरीपूर्वी काय घडलं?
चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये TVK प्रमुख विजय व्यासपीठावरून जनतेला संबोधित करताना दिसत आहेत. गर्दीतील गोंधळ पाहून त्यांनी आपले भाषण अचानक थांबवले. त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यास सांगितले. तसेच, त्याचवेळी एका लहान मुलीच्या हरवल्याची माहिती मिळाल्यावर, विजय यांनी तातडीने कार्यकर्त्यांना तिला शोधण्यासाठी मदत करण्याची विनंतीही केली होती.
#WATCH | Tamil Nadu: A large number of people attended the campaign of TVK (Tamilaga Vettri Kazhagam) chief and actor Vijay in Karur
— ANI (@ANI) September 27, 2025
A stampede-like situation reportedly occurred here. Several people fainted and were taken to a nearby hospital. More details are awaited.… pic.twitter.com/4f2Gyrp0v5
मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी दिले तातडीचे निर्देश
या दुर्घटनेबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) समाजमाध्यमावर पोस्ट करत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, "करूरमधून आलेली ही बातमी अत्यंत चिंताजनक आहे."
चेंगराचेंगरीमुळे बेशुद्ध झालेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री स्टालिन यांनी माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यन आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
जवळच्या त्रिची जिल्ह्यातील मंत्री अनबिल महेश यांनाही युद्धपातळीवर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, त्यांनी एडीजीपी यांच्याशीही चर्चा केली असून, लवकरात लवकर परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना पोलीस, प्रशासन आणि डॉक्टरांना मदत करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world