Feeling Sleepy After Meals: हिवाळा ऋतूमध्ये आळस अधिकच जाणवतो. विशेषतः दुपारी जेवल्यानंतर झोप जरा जास्तच येऊ लागते. डोळ्यांच्या पापण्या जड होणे, सुस्तपणा आणि आळसामुळे काम पूर्ण करणं कठीण ठरते. कामांमध्ये लक्ष्य लागत नाही, त्यामुळे कामं उशीराने पूर्ण होतात. तुम्ही देखील या समस्येमुळे हैराण आहात का? प्रसिद्ध डॉक्टर शालिनी सिंह सोलंकी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या समस्येमागील कारणं सांगितली आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे जेवणानंतर झोप येते, या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले उपाय जाणून घेऊया...
दुपारच्या जेवणानंतर झोप का येते? जाणून घेऊया कारणं...
कार्बोहायड्रेट्सयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही दुपारच्या जेवणात पोळी, भात आणि गोड पदार्थांचा समावेश करत असाल तर शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी अचानक वाढते. यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि झटकन ऊर्जा कमी देखील होते. शरीराची ऊर्जा कमी झाल्यास झोप येऊ लागते.
जास्त प्रमाणात तेलकट पदार्थांचे
जेवणामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा समावेश असेल तर अन्नाचे पचन करण्यास शरीराला जास्त प्रमाणात मेहनत करावी लागते. अशा परिस्थिती शरीराचे बहुतांश रक्त आणि ऊर्जा पोटाच्या दिशेने वाहू लागते. परिणामी मेंदूला ऑक्सिजनचा कमी प्रमाणात पुरवठा होतो आणि सुस्तपणा जाणवू लागतो.
पाणी कमी पिणे
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे पचनप्रक्रिया धीम्या गतीने होते, अन्नाचे पचन हळूहळू होत असल्याने शरीर जड झाल्यासारखे वाटते. यामुळे आळस आणि झोप (Feeling Sleepy After Meals) येऊ लागते.
रात्री तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर दुपारच्या जेवणानंतर शरीराला अधिक आरामाची गरज भासते, यामुळेही झोप येऊ लागते.
(नक्की वाचा: Frequent Urination In Winter: हिवाळ्यात वारंवार लघवी का होते? ही पावडर खा, समस्या होईल दूर आणि मिळेल गाढ झोप)
काही लोकांना थोडेसे खाल्ल्यानंतरही झोप येऊ लागते, यामागे अॅनिमिया (रक्ताची कमतरता) किंवा थॉयराइडची समस्या कारणीभूत असू शकतात. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Bad Cholesterol Symptoms: बॅड कोलेस्टेरॉलला सायलेंट किलर का म्हणतात? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय)
सुस्तपणा कमी करण्यासाठी काय करावे?-
दुपारचे जेवण पचनास हलके आणि पौष्टिक असावे. जास्त प्रमाणात कार्ब्स आणि तळलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करू नये.
- जेवण केल्यानंतर पाच ते 10 मिनिटे वॉक करावे.
- दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
- सात ते आठ तासांची झोप घ्यावी.
- या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतरही समस्या कायम असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)