जाहिरात

Swatantrya Veer Savarkar : या तरुणाचा ब्रिटिशांना रागही होता आणि भीतीही वाटत होती! लाला लजपतराय यांचा सावरकरांवरील विशेष लेख

Swatantrya Veer Savarkar Birth Anniversary: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यातील महत्त्वपूर्ण गुणांबाबत सविस्तर स्वरुपात माहिती जाणून घेऊया...

Swatantrya Veer Savarkar : या तरुणाचा ब्रिटिशांना रागही होता आणि भीतीही वाटत होती! लाला लजपतराय यांचा सावरकरांवरील विशेष लेख
स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत या गोष्टी माहिती आहेत का?

- चंद्रशेखर साने, अभ्यासक-संशोधक, लेखक-वक्ते

1. सशस्त्र क्रांतीचे प्रणेते

भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी संघर्ष केले. काहींचा मार्ग होता ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीला साद घालणे, अर्जविनंत्या करणे ज्याला सनदशीर मार्ग म्हणता येईल. तर दुसरा मार्ग सशस्त्र क्रांतीचा, सैनिकी उठाव करुन ब्रिटीश सत्ता उखडून टाकण्याचा. ब्रिटीशांनी आपणास रणभूमीवर पराभूत केले आहे. तलवारीनेच आपणास स्वातंत्र्य मिळू शकते. "रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना,असा भूतकालिन सिद्धांत जाणा" यावर ठाम विश्वास होता. या दुसऱ्या विचारधारेचे अग्रणी म्हणजे स्वातंत्र्य वीर सावरकर. सावरकरांच्या आधीही उमाजी नाईक, 1857चा सैनिकी उठाव, रामसिंग कुका किंवा वासुदेव बळवंत फडके अशी सशस्त्र क्रांतीची काही ठळक उदाहरणे आहेत. तथापि सशस्त्र क्रांतीचे शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञान सर्वप्रथम मांडले ते वीर सावरकरांनी! त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा भारतीय क्रांतिकारकांच्या मनावर खोल परिणाम झाला तर ब्रिटिशांनी त्यांची धास्ती घेतली.  सावरकरांना त्यांच्या आधीच्या पिढीतला इटलीचा क्रांतिकारक आणि राष्ट्रवादी नेता जोसेफ मॅझिनी याचे चरित्र प्रभावी आणि भारतीयांसाठी प्रेरक वाटले. त्याचे आत्मचरित्र त्यांनी मराठीत आणले आणि त्या आत्मचरित्राला स्वत: एक दीर्घ प्रस्तावना लिहिली. ब्रिटिशांनी या पुस्तकावर बंदी घातली. ही प्रस्तावना तेजस्वी अशीच होती. इतकी की महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी बंदी येण्याआधीच ती मुखोद्गत करुन टाकली. सावरकरांनी पुढे लंडनमध्ये आपल्या अभिनव भारत या गुप्त संस्थेची उभारणी केली. तिथेच त्यांनी भारतीयांना विस्मरणात गेलेला भारतीय स्वातंत्र्यलढा 1857चा चा विद्रोह पुन्हा स्मरण करुन देणारा ग्रंथ लिहिला तो म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर. या ग्रंथाचा सशस्त्र क्रांतिकारकांवर फार मोठा प्रभाव पडला. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. प्रथम हुतात्मा भगतसिंग आणि नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच्या आवृत्त्या आपल्या अनुयायांसाठी छापल्या एवढे सांगितले तरी पुरे. दुसऱ्या विश्वयुद्धात सावरकरांनी सैनिकीकरणाची हाक दिली. अनेक राष्ट्रीय वृत्तीचे तरुण सैन्यात शिरले. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी आणि त्याचबरोबर आझाद हिंद सेना, नाविक दलाचे बंड अशा कारणांनी सैन्यशक्ती आपल्या बाजूने उरली नाही तेव्हा भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटिशांना भाग पडले. सशस्त्र क्रांती आणि सनदशीर मार्गाने जागृत झालेला समाज अशा दोन्ही कारणांमुळे आपण स्वातंत्र्य मिळवले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2. साहित्यिक सावरकर

मराठी भाषेचे साहित्यकार म्हणून सावरकरांचे स्थान इतिहासात अढळ आणि अमर झाले आहे. इतिहास लेखन, चरित्र*आत्मचरित्र, महाकाव्य, कथा, कादंबरी, नाटके, ललित लेख, प्रबोधन असे अनेक प्रकारचे लेखन प्रकार त्यांनी हाताळले. आजही त्यांचे साहित्य वाचले जाते. त्यांचे आत्मचरित्र "माझी जन्मठेप" बहुतेक मराठी बांधवांनी वाचलेले असते. त्यांच्या पुस्तकांची विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. मराठी भाषेच्या शुद्धीला त्यांनी प्राधान्य दिले. परकीय भाषेतील अनेक शब्द मराठीत घुसल्याने त्यास अनेक प्रतिशब्द त्यांनी नव्याने दिले तर काही नव्याने पुनरुज्जीवित केले. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. एकदा नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. मराठी काव्यप्रकारातील "वैनायक" नावाचे वृत्तही त्यांनी नव्याने निर्माण केले. त्याशिवाय देवनागरी लिपी सुधारणा करण्याचाही प्रयत्न आणि प्रयोग त्यांनी केला.

(नक्की वाचा: Veer Savarkar Jayanti 2025 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे 10 प्रेरणादायी विचार)

3. सावरकर आणि अध्यात्म

प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा असा एक मानसिक आणि आंतरिक प्रवास सुरू असतो. सावरकरांसारख्या प्रदीर्घ आयुष्य जगलेल्या आणि आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवलेल्या व्यक्तीचे काही अध्यात्मिक प्रवास असणार हे तर उघड आहे आणि ते त्यांनी शब्दबद्धही करुन ठेवले आहेत. आध्यात्मिक विचार हे माणसाच्या आत्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरतात. सावरकर एकाच वेळी बुद्धिवादी आणि आध्यात्मिक कसे असू शकतात असे काही जणांना वाटू शकते. त्या वादात न पडता आपण रुढार्थाने सावरकर अज्ञेयवादी होते असे म्हणू शकतो. थोडक्यात त्यांच्या अध्यात्माला त्यांनी वैज्ञानिक कसोटी लावल्या आहेत असे म्हणता येईल. सावरकर उपयुक्ततावादी असल्याने त्यांनी वेळप्रसंगी अध्यात्माचा उपयोग करुन घेतला आहे. जसे की त्यांची "आत्मबल" ही कविता त्यांनी मार्सायची धाडसी उडी अपयशी ठरल्यानंतर स्वत:च्या मनाला बळ देण्यासाठी रचली होती. अनादी अनंत अवध्य अशा आत्म्याचे वर्णन त्यांनी यात केले. अंदमानात त्यांनी फावल्या वेळात केलेल्या ध्यानधारणेचा उल्लेख  आपल्या सप्तर्षी या काव्यात केला आहे. म्हणजे राजयोगाचा त्यांनी अभ्यास केला होता. पातंजल योगसूत्रे त्यांना तोंडपाठ होती. भक्तीयोग तर त्यांच्या आयुष्यात होताच. त्यांच्यासारखा देशभक्त अभावानेच आढळतो. व्यक्तीपेक्षा मातृभूमी हे त्यांचे आराध्य दैवत. त्यांनी आचरलेल्या ज्ञानयोगाविषयी काय सांगावे? विपुल साहित्य, प्रतिभासंपन्न लेखन, विज्ञान आणि शास्त्रशुद्ध केलेले युक्तिवाद आणि त्यातून लोकांचे केलेले प्रबोधन हे सर्व ते ज्ञानमार्गी असण्याचीच साक्ष आहे. कर्मयोगी तर ते होतेच होते. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्यलक्ष्मी समोर जी प्रतिज्ञा केली  तेथपासून आयुष्याच्या शेवटी केलेले प्रायोपवेशन इथपर्यंतचा सर्व काळ ते सतत कर्म करत राहिले आणि हे ज्ञानयुक्त कर्म होते. सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातले 80-90 टक्के कर्म हे स्वार्थासाठी आणि 10-20 टक्के इतरांसाठी असते. समाजासाठी तर एक-दोन टक्के केले तरी खूप. सावरकरांचा कर्मयोग 80-90 टक्के देश आणि समाज यांच्यासाठी आणि उर्वरीत 15-20 टक्के  स्वत:साठी आणि कुटुंबासाठी असावे.

Swatantrya Veer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग!! पंतप्रधानांसह अनेकांनी वाहिली आदरांजली

(नक्की वाचा:  Swatantrya Veer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग!! पंतप्रधानांसह अनेकांनी वाहिली आदरांजली)

4. कृतीशील समाजक्रांतिकारक

सावरकर कर्मयोगी होते. देशस्वातंत्र्य आणि समाजाची उन्नती हे त्यांचे ध्येय. अंदमानातील बेड्या त्यांची प्रतिभाशक्ती रोखू शकला नाही. अंदमानातील शिक्षा पुरेशी वाटल्यानंतर स्वत: सावरकरांच्या दयायाचिका आणि समाजाने / काँग्रेसने केलेले ठराव यांचा विचार करुन तसेच सावरकरांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन शेवटी ब्रिटिशांना त्यांची मुक्तता करणे भाग पडले. पण ब्रिटिशांना सावरकर नावामागील दाहक विचार माहिती असल्याने त्यांना पूर्ण मुक्त न करता रत्नागिरी जिल्ह्यात स्थलबद्ध केले. या काळात हिंदू समाजाला स्पर्शबंदी रोटीबंदी देवदर्शन बंदीसारख्या पडलेल्या बेड्या मोडण्याचा अतिशय असाध्य, वेळखाऊ प्रयोग त्यांनी आरंभला. अस्पृश्यता निवारण, रोटीबंदी मोडणे, सर्व हिंदूंना स्पृष्यास्पृश्य भेद न मानता देवदर्शनाचा अधिकार, बेटीबंदी मोडूनम जातीभेद नष्ट करुन एकजिनसी हिंदू समाज निर्माण करणे असे अनेक प्रकारचे कार्य त्यांनी सुरू केले आणि यशस्वी पणे पार पाडले.  

5. लोकशाहीवादी सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांना तब्बल 13 वर्षे स्थलबद्ध करुन ठेवल्यानंतर लोकमताच्या रेट्यामुळे सावरकरांना विनाशर्त मुक्त करणे ब्रिटिशांना भागच पडले. त्याप्रमाणे ब्रिटिशांनी काही सुधारणा दिल्यामुळे भारतीयांची मंत्रिमंडळे स्थापन होत असत. 1937 साली जमनादास मेहता आणि कूपर यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले तेव्हा त्यांनी सावरकरांची पूर्ण सुटका केली. सुटका झाल्यावर सांगोपांग विचार करुन सावरकरांनी हिंदू महासभा या पक्षात प्रवेश केला. पुढे ते सहा वर्षे अध्यक्ष म्हणून निवडून आले. गुप्त चळवळी आणि सशस्त्र क्रांतीसारख्या मार्गावरुन अगदी विरुद्ध अशा उघड, नि:शस्त्र आणि लोकशाही मार्गावरुन ते सहजी राजकारण करू लागले. त्यांचे मार्गदर्शन आणि योग्यता इतकी महत्त्वपूर्ण होती की हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून ते सलग आणि लोकशाही पद्धतीने निवडून येत असत. लोकशाहीचे मुख्य अंग म्हणजे व्याख्याने देणे, प्रचार करणे होय! या मार्गाने लोकमतात आपल्या विचारधारेप्रमाणे अनुकूल बदल घडवून आणणे!! त्याप्रमाणे सावरकरांनी देशभर दौरे केले. हजारो व्याख्याने दिली. काश्मिरपासून थेट कन्याकुमारी-त्रिवेंद्रमपर्यंत आणि बंगालपासून त्यांचे वास्तव्य असलेल्या मुंबईपर्यंत त्यांचा हिंदू जनजागृतीचा वादळी प्रचार सुरू होता. त्यांचे हिंदुत्वाचे राजकारण "एक व्यक्ती एक मत" या लोकशाही तत्त्वावर आधारीत होते. हिंदू हे हजारो वर्षे या देशात राष्ट्र आहे त्यामुळे अल्पसंख्य वा आक्रमक जमातींनी स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानून देश विभाजन करू नये हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. भारत अखंड राखण्यात मात्र काँग्रेस वा हिंदू महासभा यापैकी कोणालाच यश मिळू शकले नाही. स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक लेख लिहून आणि काही भाषणातही लोकशाहीची तत्त्वे विषद केली ती सूत्रे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतील. 1944 साली हिंदू महासभेच्या नेत्यांनी भावी स्वतंत्र हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे प्रारुप तयार केले. त्याविषयी सावरकरांनी अनुकूल मतप्रदर्शन केले. आजची राज्यघटना बहुतांशी त्या प्रारुपाशी मिळतीजुळती आहे.

6. समतावादी आणि मानवतावादी सावरकर 

सावरकरांच्या तरुण वयात त्यांच्यावर फ्रेंच राज्यक्रांतीतील "स्वातंत्र्य, समता आणि बंधुता" या तत्त्वांचा प्रभाव पडला होता. स्वातंत्र्यवीर तर ते होतेच तसेच समतावीरही होते. त्यासाठीच स्थानबद्धतेत असताना त्यांनी समाजाला पडलेल्या सप्तबेड्या तोडण्याचा प्रयत्न केला. एकजिनसी हिंदुराष्ट्रात सर्व जण समान मूल्याचे आहेत. भारतीय म्हणून केवळ मतदानापुरताच नाही तर प्रत्येक मताला समान मानवी मूल्य आहे या भावनेने त्यांनी काम केलेले दिसते. त्यांना हिंदू समाज संघटीत, समर्थ व्हायला हवा होता पण त्यांचा तो हिंदुराष्ट्रवाद इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी नव्हता, इतरांचे शोषण करण्यासाठी नव्हता तर तो इतरांच्या राष्ट्रवादापासून आत्मसंरक्षण करणारा होता. एक प्रकारे घराचे संरक्षण करण्यासाठी आपण तारांचे कुंपण घालतो किंवा कडी कोयंडे लावून कुलूप घालतो तसे त्यांचा हिंदू राष्ट्रवाद म्हणजे आत्मसंरक्षणाचे कुलुप होते. त्यांच्या काव्यातील पुढील ओळी त्यांच्या समता दृष्टीची साक्ष देतात.

कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला
समतेची ममतेची सृजन रक्षणाला ॥

सावरकर मानवतावादी होते. पृथ्वीवरील सर्व मानव जात एकच. समान मूल्याची. वसुधैव कुटुंबकम्‌ या आपल्या प्राचीन ध्येयावर त्यांची श्रद्धा होती. हिंदुत्व या त्यांच्या ग्रंथाचा शेवट आमचे हिंदुत्व म्हणजे "भुवनत्रयामध्ये वास" या तुकोक्तीने त्यांनी केला आहे. आधी वास्तवात जगायचे आणि तेथून आपले मार्गक्रमण मात्र अखिल मानवजातीचे हित या आदर्शाकडे करायचे असा व्यावहारिक विचारांचा होता.

7. विज्ञाननिष्ठ सावरकर

आपला भारत देश, प्रिय हिंदुस्थान हा समर्थ आणि आधुनिक व्हावा हे त्यांनी ध्येय मानले. सांप्रदायिक तत्त्वांवर राष्ट्र उभे करण्याचे तमोयुग संपले आता राष्ट हे विज्ञान बळावर, शास्त्रशुद्ध विचारांवर, राष्ट्राच्या आणि मानवाच्या हिताचे काय याचा विचार करुन उभारायचे आहे. त्यामुळे वैज्ञानिक आणि शास्त्रशुद्ध विचारसरणी ही साधने त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी उपकारक मानली. खरा सनातन धर्म कोणता? तर निसर्गाचे जे शाश्वत नियम माणसाला दिसतात, जाणवतात, अनुभवाला येतात आणि प्रयोग, निरिक्षण, तर्क इत्यादी द्वारे सिद्ध होतात तेच सनातन धर्म असा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. विज्ञान म्हणजे राष्ट्राने केवळ आधुनिक तंत्रे, शस्त्रास्त्रे आधुनिक प्रगती इतकाच मर्यादित अर्थ त्यांच्या विज्ञाननिष्ठेत नव्हता. आयुष्यातील प्रत्येक पैलूवर शास्त्रोक्त दृष्टिकोन बाळगून आपले हित करुन घेणे अशी त्यांची शिकवण होती. आजच्या भारतीय राज्यघटनेलाही भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे महत्त्वाचे वाटते. सावरकरांनी 100 वर्षांपूर्वी तोच दृष्टिकोन आपल्या विज्ञाननिष्ठ निबंधातून मांडलेला आहे.

8. मृत्युंजय सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचा कठोर मार्ग निवडला. जीवावर उदार होऊन अनेक प्रकारचे धाडस केले. लाला लजपतराय यांनी 1917 सालामध्ये सावरकरांवर लेख लिहिला. त्यात ते म्हणतात, सावरकर हा तरुण सध्या अंदमानात कठोर कारावासाची शिक्षा भोगत आहे. जिवाची पर्वा न करता भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी संकटात उडी घेणे हा त्यांचा स्वभाव आहे. खरंतर राजद्रोह आणि हत्येला पिस्तुले पाठवून सहाय्य या दोन आरोपांखाली सावरकरांना फाशीचीच शिक्षा होऊ शकली असती. पण सावरकरांविषयी ब्रिटिशांचा राग आणि भय एकाच वेळी इतका अनावर होता की फाशी देणे ही शिक्षा ब्रिटिशांना सोपी वाटत होती. त्यामुळे कणाकणाने कष्ट भोगत, जगणे नकोसे वाटायला लावणारी, अभूतपूर्व अशी दोन जन्मठेपींची आणि ती ही एकत्र नव्हे तर एकामागून एक अशी 50 वर्षे भोगावयाची शिक्षा त्यांना देण्यात आली. सुटकेचे वर्ष होते १९६०! तुरुंगात असतानाही एकीकडे अर्ज विनंती, दयायाचिका लिहित असताना ते निराश होऊन मनाने मोडून स्वस्थ बसले नव्हते. दुसऱ्या बाजूने त्यांनी पंजाबी आणि बंगाली क्रांतिकारकांशी संधान बांधून सुटकेचा धाडसी प्रयत्न केल्याच्या नोंदी ब्रिटीश कागदपत्रात आढळतात. अंदमानातील कठोर शिक्षांमुळे त्यांची प्रकृती क्षीण झाली. आतडी कमकुवत होऊन पचनशक्ती मंद झाली. तुरुंगातून सुटल्यावर सुद्धा त्यांना बरेचदा बारीक ताप येत असे. तरीही ते सतत कर्मयोग्यासारखे लढत राहिले. देशभर वादळी प्रचार दौरे केले. हिंदू समाजासाठी सामाजिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर लढले. 1960 साली 50 वर्षे शिक्षेची पूर्तता होत असल्याने "मृत्युंजय दिन" म्हणून पुण्यात त्यांचा सर्वपक्षीय असा भव्य सत्कार करण्यात आला. 1966 साली आता आपले कार्य संपले, देह थकला, उगाच इतरांवर भार होऊन जगत रहाण्यापेक्षा, आता मृत्यू स्वत:हून येत नाही तर आपणच त्यास आमंत्रण द्यावे, या विचाराने एकाद्या राजयोग्याप्रमाणे त्यांनी प्रायोपवेशन करुन मृत्यू स्वीकारला. हा मृत्यू एखाद्या महानायकाला साजेसा असाच होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com