Mumbai News : राज्यातील पोलीस व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकसंख्येनुसार सुसंगत बनवण्यासाठी राज्य शासनाने २५ ऑगस्ट २०२३ रोजी पोलीस ठाण्यांच्या स्थापनेसाठी नवीन निकष जारी केले. या निकषांनुसार प्रत्येक जिल्ह्याला पोलिसांकडील आकृतीबंध नव्याने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत सांगितले. सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
(नक्की वाचा- Anil Parab : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नव्या निकषांमध्ये लोकसंख्येनुसार पोलीस ठाण्यांची गरज, दोन ठाण्यांमधील अंतर, शहरी व ग्रामीण भागातील ठाण्यांची रचना, आवश्यक विभाग व अधिकारी यांचा समावेश आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व जिल्ह्यांना नव्याने आकृतीबंध तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
(नक्की वाचा : Devendra Fadnavis : आधी ऑफर, नंतर भेट, अखेर फडणवीसांना उद्धव ठाकरेंकडून काय हवंय? )
अहिल्यानगर जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण ५५० नवीन पदे मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.