- अहिल्यानगर तालुक्यातील निंबळकमध्ये धार्मिक स्थळाच्या बांधकामाविरोधात ग्रामसभा घेण्यात आली
- ग्रामस्थांनी बांधकामासाठी आवश्यक प्रशासकीय परवाने, मालकी आणि तांत्रिक कागदपत्रे तपासण्याची मागणी केली आहे
- ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे
प्रसाद शिंदे
अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक येथे एका नियोजित धार्मिक स्थळाच्या बांधकामाबाबत ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेत बांधकामाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर चर्चा करण्यात आली. नियमांचे उल्लंघन होत असल्यास हे काम थांबवण्यात यावे, असा ठराव ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत मंजूर केला आहे. या बांधकामासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय परवानगी, जागेची मालकी आणि तांत्रिक कागदपत्रे यांची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतीच्या ठरावाची प्रत महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून यावर तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयानुसार, आता हे प्रकरण प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहे. सरकारी यंत्रणांकडून या जागेचा पंचनामा आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
ग्रामसभेच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी एमआयडीसी पोलिसांनी देखील बंदोबस्त तैनात केला होता. अहिल्यानगरच्या निंबळकमध्ये मशिदीच्या बांधकामाला गावकऱ्यांचा विरोध आहे. यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत आपला विरोध दर्शविल्याचं सरपंच लामखेडे यांनी सांगितलं. अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसात धार्मिक तणाव निर्माण होणाऱ्या घटना समोर आल्या होत्या. त्यात आता या मशिदीच्या बांधकामाला विरोध दर्शवल्याने प्रकरण ही चिघळण्याची दाट शक्यता आहे. मात्र प्रशासनाने सर्वांनाच शांततेचे आवाहन केले आहे.
ग्रामसभेनंतर मुस्लिम समाजाशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुस्लिम समाजाने आम्ही भूमिका दोन ते तीन दिवसानंतर स्पष्ट करणार आहोत असं सांगितलं आहे. त्यामुळे एकंदरीतच या वादावरती पडदा पडला असल्याचं ही बोललं जात आहे. ग्रामसभेनंतर हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांच्या हस्ते गावातील मारुती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. मात्र दोन दिवसानंतर मुस्लिम समाज काय भूमिका घेतो याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या गावात शांतता आहे. शिवाय अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world