- आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभाव यांचा अखंड प्रवाह आहे
- श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा नेवासाहून पंढरपूरकडे प्रस्थान करत मुस्लिम समाजाने उत्साहाने स्वागत केले
- मुस्लिम युवकांनी वारकऱ्यांना पाणी आणि अल्पोपहार देऊन प्रेमाने सेवा आणि आदरातिथ्य दर्शविले
प्रसाद शिंदे
आषाढी वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी पायी वारी नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीतील समता, सेवा, प्रेम आणि बंधुभावाचा अखंड प्रवाह आहे. या परंपरेला साजेसा हृदयस्पर्शी अनुभव शहरातील कोठला परिसरात पाहायला मिळाला. श्रीक्षेत्र नेवासाहून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळा दिंडीचे शहरात आगमन झाले. तिथेच मुस्लिम समाज आणि आय लव्ह अहमदनगर फाऊंडेशन यांच्यावतीने अत्यंत उत्साहात सेवाभावाने माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. दिंडीचे कोठला येथे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. धर्म जरी वेगळे असले तरी भक्तीची भावना मात्र एक होती, याचेच दर्शन इथं झाले.
टाळ-मृदंगाच्या गजरात, “ज्ञानोबा-तुकाराम”,विठ्ठल नामाच्या घोषात दिंडीचे आगमन झाले. हातात पाण्याच्या बाटल्या आणि अल्पोपहार घेऊन उभे असलेले मुस्लिम युवक प्रत्येक वारकऱ्याला प्रेमाने स्वागत करत होते. “माऊली... पाणी घ्या... अल्पोपहार घ्या...” असा आग्रह केला जात होता. या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जात होती. हा सेवाभाव पाहून अनेक वारकरी भारावून गेले होते. दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांनीही मुस्लिम बांधवांनी केलेल्या आदरातिथ्याला मनापासून प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे यातून दर्शन होत होते.
अनेकांनी प्रेमाने हस्तांदोलन करुन बंधुभावाचे दर्शन घडविले. काही क्षणांसाठी धर्म, जात, पंथ, भाषा यांचे सर्व भेद विरघळून गेले. “अवघे एकचि झालो आपण” हा संतविचार प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. या वेळी बोलताना साहेबाना जहागीरदार यांनी सांगितले की वारकऱ्यांची सेवा करणे हे आमच्या नशिबी आले हे भाग्य आहे. ही वारी म्हणजे समतेची आणि बंधुत्वाची वारी आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. ही नुसती वारी नाही तर ही एक चळवळ आहे. सर्वांना एकत्र करणारी ही चळवळ आहे अशा भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या.
मुस्लिम समाजाच्या माध्यमातून दिंडीतल्या लोकांना पाणी, अल्पोहार देण्यात आला. वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. ही महाराष्ट्राची देशाची संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. एकीकडे दोन समाजात भींत पाडण्याचं काम सुरू आहे. अशा वेळी मुस्लिम समाज प्रेमाचा पुल बांधण्याचं काम करत आहे असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. भविष्यात ही हिच भूमीका असणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षी दिंडीचं स्वागत केलं, असचं स्वागत दर वर्षी आणि भव्य पणे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलं. यातून समजेचा बंधुत्वाचाच संदेश दिला गेला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world