Ajit Pawar Death Analysis : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वादळी पर्व अजित पवार यांच्या निधनाने दुर्दैवीरित्या संपुष्टात आले आहे. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघाताने केवळ एका दिग्गज नेत्यालाच हिरावून घेतले नाही, तर राज्याच्या राजकीय समीकरणांनाही मोठा हादरा दिला आहे. महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना महाराष्ट्राच्या सत्तेचे गणित पूर्णपणे बदलून टाकणारी ठरू शकते.
अजित पवार यांच्या जाण्याने महायुती आणि राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात पाहूया...
1. महायुतीमधील शक्ती संतुलनाचा आधार हरपला
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर बरोबर एका वर्षाने अजित पवार यांनीही आपल्या काकांचा म्हणजेच शरद पवारांचा पक्ष फोडून महायुतीत प्रवेश केला. अजित पवार सत्तेत आल्याने महायुतीला एक वेगळी ताकद मिळाली होती. विशेषतः 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या होत्या.
महायुती सरकारमध्ये अजित पवार हे भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या राजकीय महत्त्वाकांक्षेला लगाम घालण्यासाठी भाजपसाठी अजित पवार हे एक उत्तम 'काऊंटर बॅलन्स' होते. आता अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सत्तेतील वजन वाढण्याची शक्यता असून, भाजपला त्यांना हाताळणे आव्हानात्मक ठरू शकते.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death : पोकळी मोठी,दावेदार अनेक; अजित पवारांचा राजकीय वारसा पेलण्याची ताकद कोणात? वाचा सविस्तर )
2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि वादाचे वळण
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली, मात्र अजित पवारांना बाजूला ठेवले होते. यामुळे नाराज झालेल्या अजित पवारांनी शरद पवारांशी जवळीक साधण्याचे संकेत दिले होते.
याच काळात अजित पवारांनी भाजपावरही शरसंधान केले होते. 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरून त्यांनी सत्तेत सोबत असलेल्या भाजपालाच सुनावले होते. पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नऊ वर्षांच्या कारभारावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोप प्रत्यारोपामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असतानाच हा भीषण अपघात झाला.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death : 'उद्या भेटू' म्हणाली अन् काही वेळातच...अजित पवारांच्या विमानातील एअर होस्टेसची करुण कहाणी )
3. राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाचे संकट
अजित पवारांच्या निधनानंतर सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याचा आहे. अजित पवारांनी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या गटापेक्षा सरस कामगिरी करून आपणच 'रिअल राष्ट्रवादी' असल्याचे सिद्ध केले होते. मात्र, आता त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी पक्षात एकमत होईल का, हा कळीचा मुद्दा आहे.
पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत आहेत. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचे नावही चर्चेत असले तरी, त्यांचा मागील राजकीय प्रवास फारसा प्रभावी राहिलेला नाही. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांसारखे मास लीडर पक्षात असले तरी, ते पक्षप्रमुख म्हणून सर्वांना मान्य होतील का, याबाबत साशंकता आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Net Worth: अजित पवारांचे अपघाती निधन, किती श्रीमंत होते उपमुख्यमंत्री? पाहा संपत्तीचा सर्व तपशील )
4. आमदारांची पळापळ रोखण्याचे भाजपासमोर आव्हान
अजित पवारांच्या गटातील 41 आमदारांना एकत्र ठेवणे हे भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता मोठे आव्हान असेल. हे आमदार पुन्हा शरद पवारांकडे किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे वळले, तर त्याचा थेट फायदा विरोधी पक्षाला आणि सत्तेत एकनाथ शिंदे यांना होईल. अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची कोणाला द्यायची, यावरही पक्षात एकमत होणे कठीण दिसत आहे, कारण त्यांच्या गटात त्यांच्या तोडीचा दुसरा कोणताही नेता सध्या दिसत नाही.
5. पवार कुटुंबातील संभाव्य पुनर्मिलन आणि तिढा
अजित पवारांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता अधिक प्रबळ झाली आहे. मात्र, जर पक्ष एकत्र आला, तर नेतृत्वाचा तिढा पुन्हा निर्माण होऊ शकतो. शरद पवार आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना पुढे करण्याची शक्यता आहे, जे सुनेत्रा पवार किंवा अजित पवारांच्या समर्थकांना मान्य होईलच असे नाही. अशा परिस्थितीत हा पक्ष पुन्हा एकदा अंतर्गत वादात अडकून स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करण्याची भीती आहे.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणात जे वादळ निर्माण केले आहे, त्याचे परिणाम येणाऱ्या काळात स्पष्ट होतीलच. मात्र, त्यांच्या जाण्याने राज्याने एक रोखठोक आणि कामाचा उरका असलेला नेता गमावला आहे, हे निश्चित.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world