संकेत कुलकर्णी, पंढरपूर
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठलाचा कार्तिकी एकादशीचा सोहळा येत्या 2 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. परंपरेनुसार, कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री यांना मिळत असतो.
दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे मंदिर समितीसमोर पेच
राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने यावर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा बहुमान कुणाला द्यायचा, असा पेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीसमोर उभा राहिला आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असल्याने, कुठल्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करायची, याबद्दल मंदिर समितीला निर्णय घेणे कठीण झाले आहे.
(नक्की वाचा- BJP vs Shivsena: "मीरा-भाईंदर महापालिकेने शिवसेनेत प्रवेश केला!" भाजप आमदाराची फेसबुक पोस्ट चर्चेत)
विधी व न्याय विभागाकडे मागितला अहवाल
हा गुंता सोडवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिर समितीने या संदर्भात राज्याच्या विधी व न्याय विभागाला विचारणा केली आहे.
(नक्की वाचा- Akola News: 'अपघात झालाय, पैशांची मदत करा!', एकनाथ शिंदेंना थेट कॉल, पण सत्य समोर येताच...)
विधी व न्याय विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पंढरपूरच्या विठ्ठलाच्या महापूजेचा मान एकनाथ शिंदेंना मिळणार की अजित पवारांना, याबाबतचा फैसला होणार आहे. हा तिढा लवकरच सुटण्याची अपेक्षा असून, 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापूजेचे मानकरी कोण असतील, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.