Rohit Pawar Janata Darbar : २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अजित दादा बारामतीला प्रचारासाठी निघाले होते. त्यातच त्यांचं निधन झालं. अजित पवारांच्या कामाचा जबर धडाका होता. अजित दादांचं काम, बैठकांना सकाळी लवकर सुरूवात व्हायची. हीच शिकवण त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना दिली होती. त्यातही अजित पवारांचा जनता दरबार अत्यंत प्रसिद्ध. यामध्ये अजित पवार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खंबीरपणे उभे राहायचे. बारामती आणि मुंबईत दर आठवड्याला अजित दादांचा जनता दरबार भरवला जायचा. अजित दादांच्या जनता दरबारात आपल्याला न्याय मिळेल, असा लोकांमध्ये विश्वास होता.
दरम्यान अजित पवार यांचा जनता दरबार सुरू राहणार आहे. मात्र आता हा जनता दरबार रोहित पवार घेणार आहे. आठवड्यात दर मंगळवारी रोहित पवार जनता दरबार घेणार आहेत. प्रत्येक मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान राष्ट्रवादी भवन, ठाकरसी हाऊस, जे.एन. हेरेडिया मार्ग, बलार्ड इस्टेट, मुंबई येथे रोहित पवार जनता दरबार घेणार आहेत, शरद पवार गटाने यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
अजित पवारांच्या शोकप्रस्तावादरम्यान रोहित पवार म्हणाले...
- सभागृहात पहिला येणारा आणि शेवटी जाणारा नेता अजित पवार असायचे. चुकले तर कान पकडायचे आणि चांगले बोललो की स्तुती करायची.
- व्यक्तिगत, बेकायदेशीर विषय घेऊन आलेल्यांचा त्यांना राग यायचा.
- दादांवर नको नको ते आरोप झाले. दादा तेव्हा अस्वस्थ व्हायचे. पण एकही आरोप सिद्ध करता आले नाहीत. दादा आता नाहीत, त्यामुळे ते आरोप व ते डाग आता पुसले पाहिजेत. आरोपांचे गठडे समुद्रात टाकले गेले तर ती त्यांना आदरांजली ठरेल.
- दादांच्या मृत्यूबद्दल तुरूंगात टाकल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. तो कितीही मोठा असला तरी सुटका नाही.
- मला ते म्हणायचे झिपऱ्या कमी कर… राजकीय वजन वाढवत जा आणि शारीरिक वजन कमी कर.