
राहुल तपासे, प्रतिनिधी:
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi News: टाळ मृदुंगाचा गजर आणि विठुनामाच्या गजरात आषाढी वारीचा सोहळा सध्या सुरु आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. एकीकडे वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागली असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटणमध्ये विसाव्यासाठी थांबलेल्या माऊलींच्या पालखीत दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फलटणच्या बरडजवळ विसाव्यासाठी टेंट उभारत असताना ही दुर्दैवी घटना घडली. टेंट उभारताना लोखंडी रॉडला हात लावताच विजेचा धक्का बसल्याने या दोन्ही वारकऱ्यांचा मृत्यू झाला. मधुकर शेंडे (वय 57 वर्षे) आणि तुषार बावनकुळे (वय वर्षे 25) अशी या दोघांची नावे नावे आहेत.
बरड पासून तीन किलोमीटर अंतरावरील असलेल्या चिंचेच्या मळ्यात तंबू ठोकण्यात आले होते. प्रथम याठिकाणी मधुकर शेंडे यांना विजेचा धक्का बसला यांना वाचवण्यासाठी तुषार बावनकुळे गेले असता दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. हे दोघेही माऊलींच्या रथामागे चालणाऱ्या दिंडी क्रमांक 26 मधील वारकरी होते. ही दिंडी नागपूर जिल्ह्यातील विहार तालुक्याच्या वासुदेव महाराज टापरे (रा.काटोल) यांची असल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नक्की वाचा - Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world