ऋतिक गणकवार, मुंबई:
Central Railway Accident: मध्यरेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर टिटवाळा रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 26 मार्च) भयंकर दुर्घटना घडल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले. रात्री ९ च्या सुमारास धावत्या पंजाब मेलखाली येऊन एका अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. सीएसएटीवरुन फिरोजपूरकडे निघालेल्या मेलखाली ही घटना घडली, या भयंकर दुर्घटनेने काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले.
टिटवाळा स्थानकात भयंकर दुर्घटना
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली अज्ञात व्यक्तीचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झाल्याने रेल्वे वाहतूक सव्वा तास विस्कळीत झाल्याची घटना घडली. टिटवाळा स्थानकातून पंजाब मेल जात असताना रुळ ओलांडणाऱ्या व्यक्तीला रेल्वेची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की मृत व्यक्तीचे तुकडे पंजाब मेलच्या इंजिनला असलेल्या कॅटल गार्डमध्ये अडकले.
मृतदेहाचे तुकडे अडकून पडल्याने ते काढेपर्यंत एक्सप्रेस टिटवाळा स्थानकात थांबून होती. अवयव निघत नसल्याने शेवटी कॅटल गार्ड कापावे लागले, त्यानंतर एक्सप्रेस १० वाजून ५३ मिनिटांनी रवाना झाली. य़ा अपघातामुळे कल्याण–कसारा मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे १.५ तास विस्कळीत झाली. त्यामुळे कल्याणहून कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल आणि उत्तर भारतात जाणाऱ्या सर्वच एक्सप्रेसला याचा फटका बसला.
दुसरीकडे, अशीच घटना विरार वैतरणा दरम्यान देखील झाली त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळ ओलांडू नका अश्या सूचना वारंवार दिल्या जातात मात्र तरीही काही प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात. याचाच फटका बसला आणि अज्ञाताला जीव गमवावा लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world