चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांच्याकडे उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर तोडगा निघेल असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसावा यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. पण काँग्रेसमधील दोन गटांमध्ये सुरू असलेल्या लाथाळ्यांमुळे निर्णय लांबणीवर पडला असून याबाबत काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक उद्या दिल्लीत होणार आहे. याबाबतचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींवर सोडला असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
नक्की वाचा: सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार? विलीनीकरण, शपथविधी आणि पवार कुटुंबातील चर्चा; DCM सुनेत्रा पवार करणार खुलासा
वडेट्टीवारांचा रोख कोणाकडे ?
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, 'राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला.' राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का? त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती? अस टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलीनीकरण बाबत जास्त चर्चा झाली.यातून काही लोकांना आनंद झाला. आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवस ही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले की "विजय वडेट्टीवार यांनी आधी चंद्रपूरचा महापौर काँग्रेसचा करण्याकडे लक्ष द्याले. काँग्रेस अंतर्गत पळवा पळवी करणाऱ्या वडेट्टीवारांना, आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी फार बोलण्याचा प्रयत्न करू नये. काँग्रेसच्या कोणत्या गटाचा नगरसेवक महापौर होतोय त्याची काळजी घ्यावी. "