Heat wave in Maharashtra : राज्यभरात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. चंद्रपुरात राज्यातील सर्वाधिक 45.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुणे वेधशाळेने यासंदर्भातील माहिती दिली. विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात पारा 40 अंशाच्या वर पोहोचला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोमवारी विदर्भ जगातील सर्वाधिक उष्ण प्रदेशांच्या यादीत आला आहे. एल्डोराडो नावाच्या वेबसाइटवर दररोज जगभरातील सर्वाधिक उष्ण आणि थंड अशा शहरांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार, सोमवारी जाहीर केलेल्या यादीतील 15 पैकी 11 शहरं भारतातील आहेत. यातील तीन जिल्हे विदर्भातील असून चंद्रपूर हे सर्वाधिक उष्ण शहर ठरलं आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतातील झारसुगडा शहरात 45.4 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे.
नक्की वाचा - Gold Price : सोन्याची किंमत एक लाखांपेक्षा जास्त का वाढली? भविष्यात दर कमी होणार का? वाचा A to Z माहिती
ब्रह्मपुरीमध्ये 45, अमरावतीमध्ये 44.6, अकोल्यात 44.1, नागपूर 43.6, वर्धा आणि यवतमाळमध्ये 43.4 अंश तापमान, मराठवाड्यातील परभणीमध्ये 42.2, बीडमध्ये 41.7 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 40.9 अंश तापमानाची नोंद आहे. मध्य महाराष्ट्रात बघता सोलापूरमध्ये 43 अंश, मालेगाव आणि जळगावमध्ये 42 अंश तापमानाची नोंद आहे. पुण्यात सुद्धा उकाड्याने नागरिक हैराण झाले असून पुणे शहरात 42 अंश तापमानाची नोंद आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना हिटव्हेवचा धोका...
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यातही मराठवाडा आणि विदर्भात हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 22 आणि 23 एप्रिलला या चार ही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची भीती वर्तवण्यात आली आहे. याशिवाय जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा चढाच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.