नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) आता महाराष्ट्राला काढता पाय घेतला आहे. मुंबई, पुणे, मराठवाड्याला तुफान झोडपल्यानंतर पावसाने माघार घेण्यास सुरूवात केली आहे. मुंबईतून पावसाने माघार घेतल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या 3-4 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून पाऊस गाशा गुंडाळेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. यंदा दसऱ्यापर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडत होता. 5 किंवा 6 ऑक्टोबरपासून पाऊस परतीच्या प्रवासाला लागेल असा अंदाज होता.
नक्की वाचा: CM फडणवीस आणि राज ठाकरे पुन्हा येणार एकत्र; कुठे-कधी-केव्हा आणि का?
आकाश निरभ्र, उकाडा वाढला
पावसाचा माघारीचा प्रवास सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांत आकाश निरभ्र झाले होते. हवेतील उकाडा वाढल्याचेही जाणवू लागले होते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पावसाच्या परतीच्या प्रवासाचा मागोवा घेणारी रेषा अलिबाग, अहिल्यानगर आणि अकोल्यातून जाताना दिसत होती. या रेषेखालील भागातून पाऊस पूर्णपणे संपला असून उर्वरीत भागातून लवकरच पाऊस काढता पाय घेईल असा याचा अर्थ आहे.
यंदा थंडीचा कडाका अधिक ?
पाऊस थांबल्यानंतर वातावरण लगेच बदलले आहे. दिवसा उकाडा आणि संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवू लागला आहे. थंडीची चाहूल लागली असून यंदा कडाक्याची थंडी पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत सकाळच्या वेळी आणि संध्याकाळनंतर वातावरणात गारवा , दिवसाचे तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, पण रात्री तापमानात घट झालेली दिसेल, यामुळे आता छत्र्या, रेनकोट गुंडाळून ठेवण्याची वेळ आली असून स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या बाहेर काढण्याची वेळ आली आहे.
नक्की वाचा: दहीसरवरून भांडूपला पोहोचा फक्त दीड तासात, खर्च येईल फक्त 75 रुपये
'तमिळनाडू' आणि 'कर्नाटक'मध्ये अतिवृष्टीचा इशारा
दक्षिण भारतातील नागरिकांसाठी मात्र दिलाशाची बातमी अद्याप तरी दिसत नाहीये. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकच्या (South Interior Karnataka) काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांत पुढील 2 दिवस म्हणजेच 10th आणि 11th ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी होईल (Very Heavy Rainfall Alert) असा इशारा देण्यात आला आहे.