Eknath Shinde secret video call UBT MP: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे गटाने बोलावलेल्या लोकसभा खासदारांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली. त्यानंतर ही फूट पडल्याचं स्पष्ट झालंय. . विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्रीच या सर्व नाराज खासदारांसोबत एक गुप्त ऑनलाईन बैठक घेऊन बंडाची संपूर्ण स्क्रिप्ट तयार केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 खासदार अनुपस्थित राहिल्यामुळे दोन तृतीयांश बहुमतासह हा गट पक्षावर दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
एकनाथ शिंदेंची रात्रीची ती ऑनलाईन बैठक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या नाराज खासदारांमध्ये तब्बल 30 ते 35 मिनिटे व्हिडिओ कॉलवर चर्चा झाली. या बैठकीत खासदारांनी कायदेशीर अडचणींबद्दल चिंता व्यक्त केली होती. जर आपण बाजू बदलली तर आपले खासदारकीचे पद धोक्यात येईल का, असा प्रश्न खासदारांनी उपस्थित केला होता.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्व खासदारांना पूर्ण धीर दिला. तुम्ही सर्वजण एकत्र राहिलात तर दोन तृतीयांश बहुमतामुळे पक्षावरच तुमचा अधिकार सांगता येईल आणि खासदारकीला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असे आश्वासन शिंदेंनी दिले. सर्व कायदेशीर प्रक्रियेत पूर्ण मदत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतरच या खासदारांनी ठाकरे गटाच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला.
( नक्की वाचा : 4 दिवसांत खेळ खल्लास! 13 जूनच्या गुप्त बैठकीपासून ते 17 जूनच्या बंडापर्यंत; Operation Tiger चा थरारक रिपोर्ट )
ठाकरे गटाचे प्रयत्न अपयशी
नाराज खासदारांशी संपर्क साधण्याची आणि त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर सोपवली होती. मात्र, हे दोन्ही नेते खासदारांना पटवून देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. या सर्व घडामोडींची आणि बैठकीला केवळ 3 लोकसभा खासदार आणि 1 राज्यसभा खासदार उपस्थित राहिल्याची माहिती अरविंद सावंत यांनी फोनवरून उद्धव ठाकरे यांना दिली.
पुढे काय होणार?
ठाकरे गटाचे संसदीय दलाचे नेते अरविंद सावंत यांनी ही बैठक बोलावली होती. आता या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या सर्व 6 खासदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.या खासदारांना 7 दिवसांमध्ये उत्तर देण्याची सूचना या नोटिशीमध्ये देण्यात आलीय. परंतु, बंडखोर खासदारांची संख्या दोन तृतीयांश म्हणजेच आवश्यक संख्याबळापेक्षा जास्त असल्यामुळे ठाकरे गटाला कायदेशीर लढाईत यश मिळणे कठीण असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
( नक्की वाचा : Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराच्या पैशांवर डल्ला मारणारे 6 संशयित कोण? SIT चौकशीत मोठे मासे अडकणार! )
बैठकीला अनुपस्थित राहिलेले खासदार
ठाकरे गटाच्या या महत्त्वाच्या बैठकीला यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, मुंबई नॉर्थ ईस्टचे खासदार संजय दीना पाटील आणि परभणीचे खासदार संजय जाधव उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्यासोबतच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली. या सर्व खासदारांच्या भूमिकेमुळे आता ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world