Heat Stroke Maharashtra: राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रात 15 एप्रिल ते 18 एप्रिलदरम्यान, मराठवाड्यात 16 एप्रिल ते 18 एप्रिलदरम्यान, विदर्भात 15 एप्रिल ते 19 एप्रिलदरम्यान तर कोकणात 15 एप्रिल ते 17 एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी आणि ORS घ्यावे
- हलके आणि सैल कपडे वापरावे तसेच बाहेर जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
- सावलीत विश्रांती घेणे आणि घरात राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- विशेषतः जेष्ठ नागरिक आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- दुपारी 12 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेदरम्यान उन्हात जाणे टाळावे.
- मद्यपान आणि कॅफिनयुक्त पेये पिणे टाळावी.
- उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळावे.
- लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
(नक्की वाचा: Maharashtra Heat Wave SOP: सावधान! महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; राज्य सरकारकडून 3 SOP जाहीर, काय आहेत नियम?)
प्रशासनाची तयारी
प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जिल्हास्तरावर Heat Action Plan कार्यान्वित करणे तसेच रुग्णालयांत आवश्यक औषध साठा ठेवणे यावर भर दिला आहे. शाळांना सूचना देणे, गरजेनुसार वेळेत बदल करणे आणि माध्यमांद्वारे जनजागृती करणे यासंदर्भातही उपाययोजना करण्यात येत आहेत.
(नक्की वाचा: Heatstroke Death News: कडक उन्हाचा धोका वाढला! राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; हिंगोलीत 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

Photo Credit: NDTV Marathi
विशेष सूचनाजनसमूह कार्यक्रमांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, वैद्यकीय मदत आणि ORS उपलब्ध ठेवावे तसेच कार्यक्रमाचा वेळ शक्यतो बदलावा, असे सांगण्यात आले आहे. कामगार, शेतकरी आणि बाहेर काम करणाऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी काम करावे, नियमित पाणी प्यावे, विश्रांती घ्यावी आणि उष्माघाताची लक्षणे लक्षात ठेवावीत. नागरिक, स्थानिक संस्था आणि उद्योग क्षेत्राने दिलेल्या सूचनांचे पालन करून उष्णतेच्या लाटेमुळे होणारे धोके कमी करावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world