- समाधान कांबाळे, प्रतिनिधी
Heatstroke Death News: राज्यात उन्हाच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली असतानाच एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यात उन्हाचा पारा 40 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे, या वाढत्या तापमानाने आपला पहिला बळी घेतला आहे. हिंगोली बसस्थानकात एका 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राज्यात उष्माघातामुळे झालेला हा पहिला मृत्यू असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख रफिक शेख उस्मान (वय 30 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. हिंगोली बसस्थानक परिसरात हा तरुण मृत अवस्थेत आढळून आला होता. स्थानिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ या घटनेची दखल घेत संबंधिक व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अहवालात उष्माघाताची पुष्टी
सुरुवातीला या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नव्हते, पण डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतर धक्कादायक वास्तव समोर आले. शेख रफिक यांचा मृत्यू हा अति उष्णतेमुळे म्हणजेच उष्माघाताने (Heatstroke) झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
(नक्की वाचा: Maharashtra Heat Wave SOP: सावधान! महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; राज्य सरकारकडून 3 SOP जाहीर, काय आहेत नियम?)

Photo Credit: NDTV Marathi
हिंगोलीत उन्हाचा तडाखा वाढला
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्याचा पारा सातत्याने 40 अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून गरम वाऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच भरबसस्थानकात तरुणाचा झालेला हा मृत्यू उन्हाच्या तीव्रतेची भीषणता दर्शवत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world